Saturday, August 8, 2026

Bastar : बस्तरच्या ९२ गावांत प्रथमच तिरंगा, नक्षली दहशतीच्या सावटातून राष्ट्रीय प्रवाहाकडे वाटचाल

Bastar : बस्तरच्या ९२ गावांत प्रथमच तिरंगा, नक्षली दहशतीच्या सावटातून राष्ट्रीय प्रवाहाकडे वाटचाल

रायपूर : नक्षलवादाच्या दहशतीमुळे गेली अनेक दशके स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनापासून दूर राहिलेल्या छत्तीसगडमधील बस्तरच्या ९२ गावांत यंदा प्रथमच १५ ऑगस्टला तिरंगा फडकणार आहे. नक्षलवाद्यांकडून यापूर्वी या दिवशी काळे अथवा लाल झेंडे फडकवून सरकारी कार्यक्रमांवर बहिष्कार टाकला जात होता. आता मात्र या गावांमध्ये राष्ट्रध्वज डौलाने फडकताना दिसणार आहे. छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी ही माहिती दिली. ३१ मार्च रोजी बस्तरमध्ये सशस्त्र नक्षलवाद्यांविरोधातील कारवाईनंतरचा हा पहिलाच राष्ट्रीय उत्सव आहे. या ९२ गावांमध्ये बीजापूर जिल्ह्यातील ३३, सुकमा येथील ५० आणि नारायणपूरमधील नऊ गावांचा समावेश आहे.

बस्तरमधील प्रत्येक गावात तिरंगा यात्रा काढण्यात येणार असल्याचे शर्मा यांनी सांगितले. सिलगेर, टेकालगुडम, रानीबोदली आणि दरभा यांसारख्या दुर्गम भागांतील गावांनाही या यात्रेत सहभागी करून घेतले जाणार आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते आणि स्थानिक तरुण मोटरसायकल रॅलीच्या माध्यमातून देशभक्तीचा संदेश देणार आहेत.

नक्षलविरोधी अभियानात बलिदान दिलेल्या जवानांचे स्मरण कायम राहावे, यासाठी बस्तरमधील ५०० हून अधिक शाळा, प्रमुख चौक आणि सार्वजनिक इमारतींना शहीद जवानांची नावे देण्याची तयारी सुरू आहे. नक्षलवादाच्या सावटाखाली वर्षानुवर्षे भीतीच्या वातावरणात जगणाऱ्या बस्तरमधील नागरिकांसाठी हा बदल महत्त्वाचा मानला जात आहे. एकेकाळी लाल-काळ्या झेंड्यांच्या सावटाखाली असलेल्या गावांमध्ये आता तिरंगा फडकणार आहे. त्यामुळे बस्तरमध्ये सुरक्षेबरोबरच लोकशाही, विकास आणि राष्ट्रीय प्रवाहाशी जोडणीचा नवा अध्याय सुरू होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >