Tuesday, August 4, 2026

Nitesh Rane : मासेमारी बंदी कालावधीत गोवा सरकार करणार महाराष्ट्राला सहकार्य

Nitesh Rane : मासेमारी बंदी कालावधीत गोवा सरकार करणार महाराष्ट्राला सहकार्य

- मंत्री नितेश राणे यांची गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा

मुंबई : महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत १५ ऑगस्टपर्यंत लागू करण्यात आलेल्या मासेमारी बंदीच्या (Fishing ban) निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी गोवा सरकार (Goa Government) महाराष्ट्राला पूर्ण सहकार्य करणार आहे. गोव्यातील कोणत्याही मच्छीमाराकडून महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत घुसखोरी करून मासेमारी केली जाणार नाही, अशी ग्वाही गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Dr. Pramod Sawant) यांनी दिल्याची माहिती राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी दिली.

महाराष्ट्राच्या मत्स्यव्यवसाय विभागाने सागरी जिवांचे संवर्धन आणि मत्स्योत्पादनात वाढ व्हावी या उद्देशाने १५ ऑगस्टपर्यंत १२ नॉटिकल मैल या राज्याच्या सागरी हद्दीत सर्व प्रकारच्या मासेमारीवर पूर्णपणे बंदी घातली आहे. या निर्णयाची सीमाभागात काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी मंत्री नितेश राणे यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी दूरध्वनीवरून सविस्तर चर्चा केली. या संवादादरम्यान राणे यांनी महाराष्ट्राच्या बंदी आदेशाची माहिती देऊन गोव्याच्या सीमेला लागून असलेल्या सागरी क्षेत्रात विशेष दक्षता घेण्याची विनंती केली होती. त्यास मुख्यमंत्री सावंत यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सहकार्याचे पूर्ण आश्वासन दिले आहे. या सहकार्याबद्दल मंत्री राणे (Nitesh Rane) यांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

अवैध मासेमारी रोखण्यासाठी विशेष नियोजन :

राज्य सरकारच्या मत्स्यव्यवसाय विभागाचे सर्व अधिकारी सागरी हद्दीवर सतर्क आणि सज्ज असून अवैध मासेमारी रोखण्यासाठी कठोर पावले उचलली जात आहेत. बंदीच्या काळात मासेमारीसाठी लागणारे डिझेल, पास किंवा कूपन यांसारख्या कोणत्याही सुविधा मत्स्य खात्याकडून दिल्या जाणार नाहीत, असे यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे. मासेमारी बंदीच्या नियमांचे पालन केल्यामुळे सागरी जिवांचे प्रजनन योग्य रीतीने होऊन भविष्यात मच्छीमारांनाच मोठा आर्थिक फायदा होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील तसेच शेजारील राज्यातील मच्छीमारांनी १५ ऑगस्टपर्यंत समुद्रात न उतरता शासनाला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >