Monday, August 3, 2026

भाजपचा ३० वर्षांचा बालेकिल्ला ढासळला, बिहारमध्ये प्रशांत किशोरांचा विजय; मध्य प्रदेशात काँग्रेसची बाजी, गुजरातमध्ये भाजपचा गड कायम

भाजपचा ३० वर्षांचा बालेकिल्ला ढासळला, बिहारमध्ये प्रशांत किशोरांचा विजय; मध्य प्रदेशात काँग्रेसची बाजी, गुजरातमध्ये भाजपचा गड कायम

नवी दिल्ली : देशातील विविध राज्यांत नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून बिहारमधील बांकीपूरमध्ये मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळाला. जन सुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी पोटनिवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. तर मध्य प्रदेशातील दतियामध्ये काँग्रेसने आपले वर्चस्व कायम राखले आहे. तर गुजरातच्या मांजलपूरमध्ये भाजपने आपला पारंपरिक गड यशस्वीपणे सुरक्षित ठेवला आहे.

बिहारच्या राजकारणात बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल ऐतिहासिक ठरणार आहे. तब्बल तीन दशकांपासून भाजपच्या ताब्यात असलेल्या या शहरी मतदारसंघात जन सुराज पक्षाचे संस्थापक आणि ख्यातनाम निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी थेट निवडणूक रिंगणात उतरून मोठा विजय मिळवला आहे. प्रशांत किशोर यांनी भाजपचे उमेदवार नीरज कुमार सिन्हा यांचा १८,९५३ मतांच्या मोठ्या फरकाने पराभव केला.

बांकीपूर हा भाजपचा अत्यंत सुरक्षित आणि मजबूत बालेकिल्ला मानला जात होता. येथून भाजपचे ज्येष्ठ नेते आणि नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी सलग पाच वेळा प्रतिनिधित्व केले होते. २०१० च्या परिसीमनानंतर बांकीपूरची जागा अस्तित्वात आल्यापासून तेथे नितीन नवीन विजयी होत आले होते. त्याआधी याच भागातून त्यांचे वडील नवीन किशोर सिन्हा हेदेखील १९९५ पासून सलग चार वेळा निवडून आले होते. मात्र, नितीन नवीन राष्ट्रीय राजकारणात सक्रिय झाल्यानंतर आणि राज्यसभा खासदार व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. या पोटनिवडणुकीत भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. भाजपला आपला हा पारंपरिक बालेकिल्ला वाचवण्यात अपयश आले. प्रशांत किशोर यांच्या या विजयामुळे भारतीय राजकारणात एका नव्या राजकीय शक्तीचा आणि बिगर-काँग्रेस, बिगर-भाजप विरोधी चेहऱ्याचा उदय झाल्याचे मानले जात आहे. या विजयामुळे बिहारच्या आगामी राजकारणावर याचे दूरगामी परिणाम होणार असून राजकीय समिकरने बदलण्याची चिन्हे आहेत.

दतियामध्ये काँग्रेसचा विजय : मध्य प्रदेशातील दतिया विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने आपली ताकद दाखवून देत ही जागा आपल्याकडेच राखली आहे. काँग्रेसचे उमेदवार घनश्याम सिंह यांनी ६,०१६ मतांच्या फरकाने भाजपचे उमेदवार आशुतोष तिवारी यांचा पराभव केला. या चुरशीच्या निवडणुकीत घनश्याम सिंह यांना एकूण ६६,७५७ मते मिळाली, तर भाजपच्या आशुतोष तिवारी यांना ६०,७४१ मते मिळाली. या लढतीत आझाद समाज पार्टीचे (कांशीराम) उमेदवार दामोदर यादव २२,५२७ मते मिळवून तिसऱ्या स्थानी राहिले. काँग्रेस आमदार राजेंद्र भारती यांना एका फसवणूक प्रकरणात न्यायालयाने शिक्षा सुनावल्यामुळे त्यांची विधानसभा सदस्यता रद्द झाली होती, त्यामुळे येथे पोटनिवडणूक घ्यावी लागली. काँग्रेसने ही जागा राखून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या विजयावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेत्यांनी राज्यात परिवर्तनाची लाट आल्याचे म्हटले असून, यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे.

मांजलपूरमध्ये भाजपचा दणदणीत विजय : गुजरातच्या वडोदरा जिल्ह्यातील मांजलपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आपले वर्चस्व कायम राखले आहे. भाजपचे उमेदवार सेंद्रभाई पटेल (सतीश पटेल) यांनी काँग्रेसचे उमेदवार भिकूभाई रबारी यांचा ३०,६३० मतांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. या निवडणुकीच्या अंतिम आकडेवारीनुसार, भाजपचे सेंद्रभाई पटेल यांना ५५,४८१ (६७.१९ टक्के) मते मिळाली, तर काँग्रेसच्या भिकूभाई रबारी यांना २४,८५१ (३०.०९ टक्के) मते मिळाली. या निवडणुकीत २,२४७ मतदारांनी 'नोटा'चा पर्याय निवडला. भाजपचे विद्यमान आमदार योगेश पटेल यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. या विजयामुळे भाजपची ही पारंपरिक जागा पक्षाकडेच सुरक्षित राहिली असून पक्षातील कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >