Friday, July 31, 2026

Nandurbar Rain Update : नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर, चांदसैली घाटात दरड कोसळली

Nandurbar Rain Update : नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर, चांदसैली घाटात दरड कोसळली

Nandurbar Rain Update : भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यभरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक जिल्ह्यांना पावसाने अक्षरशः झोडपून काढलं आहे. तर येणारे 24 तास महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांसाठी अत्यंत आव्हानात्मक असल्याचे सांगितले जात आहे. नंदुरबार जिल्ह्यातही चोवीस तासांपासून पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून नवापूर तालुक्यातील रंगावली मध्यम प्रकल्प (Rangavali Medium Project) तुडुंब भरला आहे. त्यामुळे नदीकाठच्या १२ गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (Nandurbar Rain Update)

नवापूरातील ऐतिहासिक पूल वाहतुकीसाठी बंद

दुसरीकडे नदीच्या वाढलेल्या पाणीपातळीमुळे नवापूर (Navapur) शहरातील ब्रिटिशकालीन ऐतिहासिक पूल वाहतुकीसाठी सध्या बंद करण्यात आला आहे. वाहतूक सुरक्षिततेच्या कारणास्तव पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आली आहे. नवापूर नगर परिषद (Navapur Municipal Council) आणि पोलीस प्रशासनाने पुलाच्या दोन्ही बाजूंना अडथळे उभारून वाहतूक रोखली आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, अडथळे हटविण्याचा प्रयत्न करू नये आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. (Nandurbar Rain Update)

चांदसैली घाटात दरड कोसळली

तर सातपुड्यातील धडगाव (Dhadgaon) तालुक्यात चांदसैली घाटात (Chandsaili Ghat) दरड कोसळल्याने घाटमार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. घाटाच्या तीव्र वळणावर भलीमोठी दरड कोसळल्याने धडगाव तालुक्याला जळगावमार्गे नंदुरबार जिल्ह्याशी जोडणारा महत्त्वाचा घाटमार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प झाली असून अनेक प्रवासी व वाहनचालक रस्त्यात अडकून पडले आहेत. (Nandurbar Rain Update)

आपत्कालीन यंत्रणा सज्ज

घटनेची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक प्रशासनाची पथके घटनास्थळी दाखल झाली असून दगडांचा खच हटविण्याचे काम सुरू करण्यात येत आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घाटमार्गावर प्रवास टाळावा आणि प्रशासनाने सुचविलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यात आणखी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली असून नदीकाठच्या तसेच डोंगराळ भागातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >