- तब्बल दोन तास चालली बैठक; रखडलेल्या विकासकामांबद्दल प्रश्नांचा भडिमार
मुंबई : राज्यातील विकासकामांना गती देण्यासाठी आणि प्रशासकीय कार्यक्षमतेवर भर देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेना पक्षाच्या मंत्र्यांची मंगळवारी 'शाळा' घेतली. मंत्रालयातील समिती सभागृहात पार पडलेल्या या आढावा बैठकीत खातेनिहाय प्रलंबित प्रकल्प, निधीचा विनियोग आणि रखडलेल्या कामांच्या कारणांवरून उपमुख्यमंत्र्यांनी प्रश्नांचा भडिमार केला.
अमरावती : राज्यातील मत्स्य शिक्षण आणि संशोधनाला चालना देण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक मत्स्य विज्ञान ...
या बैठकीला शिवसेनेचे सर्व मंत्री आणि त्यांच्या कार्यालयातील विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) उपस्थित होते. 'विकसित महाराष्ट्र २०४७' या आराखड्यांतर्गत २०२६-२७ या वर्षासाठी निश्चित करण्यात आलेली उद्दिष्टे (माईलस्टोन) आणि मागील दीड वर्षांत घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा या वेळी घेण्यात आला. (Shiv Sena Ministers)
जनतेची कामे वेळेवर होत नसल्याच्या तक्रारींची दखल घेत उपमुख्यमंत्र्यांनी प्रत्येक खात्याच्या कामगिरीची बारकाईने चौकशी केली. कोणती कामे पूर्ण झाली, कोणती प्रलंबित आहेत आणि ती रेंगाळण्यामागे निधीचा तुटवडा आहे की प्रशासकीय दिरंगाई, याचा जाब त्यांनी संबंधित मंत्री व अधिकाऱ्यांना विचारला. शेवटच्या टप्प्यात असलेल्या सर्व विकासप्रकल्पांना प्राधान्य देऊन ते तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश या वेळी देण्यात आले.
कामात कुचराई करणाऱ्यांची गय नाही!
लोकाभिमुख कामे करताना निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, असे आश्वासन देतानाच कामात कुचराई करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशाराही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला. राज्य सरकारच्या पायाभूत सुविधा आणि विकासप्रकल्पांना गती देण्यासाठी सर्व मंत्र्यांनी आणि अधिकाऱ्यांनी वेगाने पावले उचलावीत, असे निर्देश या बैठकीत देण्यात आले. (Political News)





