Wednesday, July 22, 2026

Crime News : चौदा महिन्यांनंतर लागला आरोपीचा सुगावा, दारूच्या नशेत 'हे' वाक्य बोलून गेला अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला

Crime News : चौदा महिन्यांनंतर लागला आरोपीचा सुगावा, दारूच्या नशेत 'हे' वाक्य बोलून गेला अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला

Crime News : दृश्यम चित्रपटाप्रमाणे पोलिसांची दिशाभूल करून खुनाचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीचा अखेर १४ महिन्यांनंतर पर्दाफाश झालाय. छत्रपती संभाजीनगरातील क्रांती चौक पोलिस ठाण्याच्या (Kranti Chowk Police Station) हद्दीतील ही धक्कादायक घटना असून, बेपत्ता चालकाचा खून झाल्याचे उघड झाले आहे.

नेमकं काय घडलं ?

४ जानेवारी २०२३ रोजी क्रांती चौक पोलिस ठाण्यात अविनाश तुकाराम साळवे (वय ४१, रा. संभाजीनगर) हे ड्रायव्हर बेपत्ता असल्याची तक्रार क्रांती चौक पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. ३ जानेवारीच्या रात्री चुलत जातो सांगून भावाकडे असे निघालेले अविनाश परत आलेच नाहीत. पोलिसांनी शोध घेतला, परंतु कोणताही सुगावा न लागल्याने ही फाईल धूळ खात पडून राहिली. कौटुंबिक आशाही मावळल्या होत्या. मात्र, तब्बल १४ महिन्यांनंतर म्हणजेच १४ फेब्रुवारी २०२४ रोजी या प्रकरणाला अनपेक्षित वळण मिळाले. अविनाशचा चुलत भाऊ राहुल उर्फ बाळ्या साळवे हा मित्रांसोबत दारूच्या पार्टीत बसला होता. नशेत जुन्या आठवणी निघाल्या आणि बाळ्याच्या तोंडून अचानक शब्द निसटले, मीच त्याला संपवलंय. पार्टीतील एका व्यक्तीने ही बाब गंभीरपणे घेत अविनाश यांच्या पत्नीला माहिती दिली.

पोलीस चौकशीत गुन्ह्याची कबुली

यानंतर अविनाश यांच्या पत्नीने क्रांती चौक पोलिस ठाण्यात जाऊन घातपाताचा संशय व्यक्त केला. तत्कालीन उपनिरीक्षक तथा सध्या उपनगर पोलिस ठाण्यात कार्यरत प्रभाकर सोनवणे यांनी बाळ्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. सुरुवातीला त्याने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या सांगण्यानुसार महामार्गालगतच्या जलवाहिनीच्या खड्यात उत्खनन करण्यात आले. मात्र, तेथे केवळ एका हाताचे हाड सापडले. यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला. प्रभाकर सोनवणे यांनी आरोपीच्या मोबाईलचा सीडीआर आणि लोकेशनची तपासणी केली. तांत्रिक पुरावे आरोपीच्या जबाबाशी जुळत नसल्याचे समोर आल्यानंतर कसून चौकशीत त्याने अखेर गुन्ह्याची कबुली दिली.

जमिनीच्या वादातून घडला खून

जमिनीच्या जुन्या वादातून ३ जानेवारी २०२३ रोजी बाळ्याने अविनाश यांच्या डोक्यात लाकडी बल्लीने वार करून त्यांची हत्या केल्याची कबुली दिली. त्यानंतर वडील किसन साळवे आणि बहीण लता उन्हाळे यांच्या मदतीने मृतदेह दाट झाडीत नेऊन जाळण्यात आला. दुसऱ्या दिवशी घटनास्थळी गेल्यावर भटक्या कुत्र्यांनी अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे अवशेष विखुरल्याचे त्याच्या निदर्शनास आले. त्यानंतर आरोपीने उरलेले अवशेष आणि राख गोणीत भरून महामार्गालगतच्या खड्ड्यात पुरून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. संशय येऊ नये म्हणून तो अनेक दिवस त्या परिसरात जाऊन परिस्थितीची पाहणी करत होता. या प्रकरणात पोलिसांनी राहुल उर्फ बाळ्या साळवे, त्याचे वडील किसन साळवे आणि बहीण लता उन्हाळे या तिघांना अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >