विधानसभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल; प्रश्न विचारून पळ काढणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये
मुंबई : "विरोधकांकडचे मुद्दे संपले असून पराभवाच्या धक्क्यातून ते अद्याप सावरलेले नाहीत. काल जो त्यांना जोर का झटका धीरे से लागला, त्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे आणि पुढे आणखी झटके बसणार आहेत," असा घणाघात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधानसभेत केला.
अध्यक्षांच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या विरोधकांना फटकारताना शिंदे म्हणाले की, सभागृहाचे कामकाज पूर्णपणे नियमांनुसार चालत असून अध्यक्षांनी विरोधकांना प्रश्न मांडण्यासाठी भरपूर संधी दिली आहे. तरीही प्रश्नांची उत्तरे ऐकण्याऐवजी गोंधळ घालणे आणि स्टंटबाजी करणे एवढाच विरोधकांचा कार्यक्रम राहिला आहे, अशी टीका त्यांनी केली. विरोधकांच्या अनुपस्थितीवर निशाणा साधताना शिंदे म्हणाले की, सरकारला प्रश्न विचारायचे आणि उत्तराची वेळ आली की सभागृहातून बाहेर पडायचे, ही विरोधकांची जुनी सवय आहे. "प्रश्न विचारून पळ काढणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये," असा टोला लगावत त्यांनी विरोधकांच्या भूमिकेची खिल्ली उडवली.
मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस असून, विधान परिषदेत उरण येथील 'भारत मुंबई कंटेनर टर्मिनल'ला जोडणाऱ्या ...
शेतकरी प्रश्नावर सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधकांनाही शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत ४५ हजार कोटी रुपयांची मदत दिली असून नुकसानभरपाईचे निकष बदलून दुप्पट मदत देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. "शेतकऱ्यांवर अन्याय झाला, सरकारने मदत केली नाही, हा विरोधकांचा दावा म्हणजे निव्वळ दिशाभूल आहे. महाराष्ट्रातील जनतेने विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. विरोधकांची राजकीय स्पेस दिवसेंदिवस कमी होत आहे, तर महायुतीवरील जनतेचा विश्वास वाढत आहे," असा टोला त्यांनी लगावला.
सभागृहाच्या पावित्र्याचा मुद्दा उपस्थित करताना शिंदे यांनी अध्यक्षांच्या निर्णयावर टीका करणाऱ्यांना सुनावले. अध्यक्षांचा निर्णय अंतिम असतो. त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? असा सवाल करत त्यांनी विरोधकांना खडसावले. २०१९ ते २०२२ या काळात विरोधी पक्षातील अनेक नेते सभागृहात नियमित उपस्थित राहत नसत, याची आठवण करून देत शिंदे यांनी विरोधकांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला. "जो शीशे के घर में रहते हैं, वो दुसरों के घर पर पत्थर नहीं मारते," असे म्हणत त्यांनी विरोधकांना आरसा दाखवला.