लवकरच महाराष्ट्राच्या दक्षिण किनारपट्टीवर धडकणार
पणजी : मान्सून गुरुवारी केरळमध्ये दाखल झाला असून सध्या मान्सूनचा उत्तरेकडे प्रवास सुरू आहे. दरम्यान, मान्सूनचे शुक्रवारी गोव्याच्या काही भागात आगामन झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली. सध्या मान्सून महाराष्ट्राच्या वेशीपर्यंत पोहोचला आहे. लवकरच तळकोकणात मान्सूनचे आगमन होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.सॅटेलाईट प्रतिमांमध्ये केरळ किनारपट्टी, कर्नाटक आणि गोव्याच्या संपूर्ण किनापट्टीवर शुक्रवारी सकाळी दाट ढगांची दाटी दिसून येत होती. त्यामुळे हळूहळू मान्सून पुढे सरकत असल्याचे दिसून येत होते. दुपारी मान्सून कर्नाटक, तामिळनाडू तसेच नैऋत्य बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांमध्ये पुढे सरकल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली. यात मान्सूनने अरबी समुद्राच्या आणखी काही भागांसह गोव्यातील काही भागांतही प्रवेश केला आहे. पुढील २ ते ३ दिवसांत नैऋत्य मान्सून मध्य अरबी समुद्र, कर्नाटक, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातील काही भाग, गोवा, तामिळनाडू तसेच नैऋत्य बंगालच्या उपसागरातील उर्वरित भाग, ईशान्य बंगालच्या उपसागरातील आणखी काही भाग तसेच ईशान्य भारतातील काही राज्यांमध्ये आणखी पुढे सरकण्यासाठी हवामान स्थिती अनुकूल आहे.
मुंबई : ‘ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्स’च्या ताज्या अहवालानुसार, या वर्षात जानेवारी महिन्यापासून ते ४ जून २०२६ पर्यंत भारतातील दिग्गज उद्योगपती गौतम ...
मान्सून गोव्यात दाखल झाला की मान्सूनच्या पुढील प्रवासाचा टप्पा हा तळकोकण मानला जातो. लवकरच मान्सून राज्यात प्रवेश करणार असून त्यामुळे तळकोकणातील काही भागात पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे. कोल्हापूर आणि कोल्हापूर घाट विभाग आदी भागांसह सातारा आणि सातारा घाट विभाग तसेच नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, बीड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर आणि नांदेड आदी भागातही वादळी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. गेल्या वर्षी २४ मे रोजी केरळ येथे दाखल झालेला मान्सून २५ मे रोजी तळकोकणात दाखल झाला होता. तर मुंबई येथे २६ मे रोजी मान्सूनचे आगमन झाले होते. यंदा केरळमध्ये दाखल झालेला पाऊस राज्याच्या वेशीपर्यंत येऊन पोहोचला आहे.