IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल २०२६ मध्ये दमदार कामगिरी करत प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ बनण्याचा मान मिळवला. रविवारी धरमशाला येथे झालेल्या सामन्यात बंगळुरूने पंजाब किंग्जला २३ धावांनी पराभूत केले.या विजयासह बंगळुरूने १३ सामन्यांत ९ वा विजय मिळवत १८ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान कायम ठेवले आणि प्लेऑफचे तिकीट मिळवले आहे. दुसरीकडे पंजाब किंग्सचा सलग सहावा पराभव झाल्याने त्यांचे प्लेऑफचे आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे.
आरसीबीच्या फलंदाजांची उत्तम कामगिरी
या सामन्यात आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार खेळला नाही. त्याच्या जागी संघाचे नेतृत्व जितेश शर्माने केले. मात्र या सामन्यात व्यंकटेश अय्यरला संधी देण्यात आली. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीची सुरुवात चांगली झाली नाही. जेकॉब बेथेलने (jacob bethell) तिसऱ्या षटकात बाद झाला. त्यानंतर देवदत्त पडिक्कल (devdutt padikkal) आणि विराट कोहलीने उत्तम भागीदारी केली. या हंगामात पहिल्यांदाच आरसीबीसाठी खेळणाऱ्या व्यंकटेश अय्यरने तर पंजाबच्या गोलंदाजाना धुऊन काढले. त्याने अवघ्या ४० चेंडूत ७३ धावांची स्फोटक खेळी केली. त्याला विराट कोहलीचा उत्तम प्रतिसाद मिळाला. कोहलीने दमदार फॉर्म कायम ठेवत ३७ चेंडूत ५८ धावांची खेळी केली.
२२३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग अपयशी
या सामन्यात पंजाबने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी निवडली होती. सामन्यात प्रथम फलंदाजी करत बंगळुरूने पंजाबसमोर २२३ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. मात्र लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्सला २० षटकांत ८ बाद १९९ धावाच करता आल्या. पंजाबकडून शशांक सिंहने २७ चेंडूत ५६ धावा करीत झुंज देण्याचा प्रयत्न केला, पण त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही.
CSK आणि राजस्थानला मोठा फायदा
या पराभवानंतर पंजाब किंग्सचे १३ सामन्यांत ६ विजय, ६ पराभव आणि १ अनिर्णित अशा कामगिरीसह १३ गुण झाले आहेत. त्यांचा आता फक्त एक सामना बाकी आहे आणि जास्तीत जास्त १५ गुणांपर्यंत ते पोहोचू शकतात. दरम्यान, गुजरात टायटन्सचे १६ गुण आहेत, तर सनरायझर्स हैदराबादचे १४ गुण आहेत.पंजाबच्या पराभवामुळे राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांना मोठा फायदा झाला आहे. राजस्थानचे अजून ३ , तर चेन्नईचे २ सामने बाकी आहेत. हे सामने जिंकले तर दोन्ही संघ पंजाबला मागे टाकत प्लेऑफच्या शर्यतीत पुढे जाऊ शकतात.
पंजाबसमोर कठीण समीकरण
पंजाबला आता प्लेऑफमध्ये पोहोचायचे असेल तर शेवटचा सामना जिंकण्याबरोबरच चेन्नई, राजस्थान आणि हैदराबाद या तीन संघांपैकी किमान दोन संघांचे उर्वरित सामने पराभूत होणे आवश्यक आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत पंजाब किंग्ससाठी प्लेऑफचा मार्ग खूप कठीण झाला आहे, त्यांचे आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे.






