सलग तिसऱ्या महिन्यात ठरावाच्या सूचना सभागृहात झाल्या रद्द
मुंबई (सचिन धानजी)
तब्बल पावणे चार वर्षांनंतर निवडणूक पार पडून भाजप शिवसेनेची सत्ता मुंबई महापालिकेत (BMC) आली. परंतु ही सत्ता आल्यानंतर, मार्च, एप्रिल आणि मे महिन्याच्या मासिक सभांचे आयोजन करून नगरसेवकांनी केलेल्या सूचनांचे ठराव महापालिका सभागृहात पटलावर मंजूरीसाठी ठेवण्यात आले होते. परंतु या तिन्ही महिन्यांमध्ये ठरावाच्या सूचनांसाठी निश्चित केलेल्या दिवशी कामकाज न झाल्यामुळे नगरसेवकांनी मांडलेल्या सर्व सूचना बाद झाल्या आहेत. सलग तिसऱ्या महिन्यांतही ठरावाच्या सूचनांचा दिवस रद्द झाल्यामुळे सूचनांचे ठराव बाद होण्याची हॅट्रीकच पूर्ण झाली आहे. त्यामुळे महापालिकेत महायुतीची सत्ता आली असली तरी नगरसेवकांच्या सूचनांसाठी काही दिवस उजाडत नाही,असे चित्र दिसून येत आहे.
मुंबई : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) हिचे वडील, ७३ वर्षीय शक्ती कपूर (Shakti Kapoor) सध्या सोशल मीडियावरील एका अत्यंत वाईट ...
मुंबई महापालिकेचा कारभार अधिक चांगल्याप्रकारे करता यावा आणि विविध योजना तसेच सूधारणा सुचवण्याच्या दृष्टीकोनातून नगरसेवकांकडून ठरावाच्या सूचना मांडल्या जातात. नगरसेवकांनी मांडलेल्या ठरावाच्या सूचनांसाठी महापौर हे पिठासीन अधिकारी म्हणून एक निश्चित दिवस जाहीर करतात. परंतु या निश्चित दिवशी सभा तहकूब झाल्यास किंवा सभेचे कामकाज रद्द झाल्यास त्या दिवशी विचारात घेतल्या जाणाऱ्या ठरावाच्या सूचना या रद्द होतात.
मार्च महिन्यात नवनिर्वाचित नगरसेवकांनी तब्बल २९ ठरावाच्या सूचना मांडल्या होत्या, यासाठी २३ मार्चची तारीख निश्चित केली होती. परंतु माजी नगरसेविका अलका केरकर यांचे निधन झाल्यामुळे दुखवटा व्यक्त करण्यासाठी ठरावाच्या सूचनेच्या दिवशी शोक प्रस्ताव मांडून सभा तहकूब करण्यात आली. त्यामुळे ज्या ठरावाच्या सूचनांमध्ये सभेच्या कामकाजात ठरावाची सूचनेवर विचार न झाल्यास फेरविचारासाठी पुढील महिन्याच्या पटलावर घेण्यात याव्यात असे ज्या नगरसेवकांनी आपल्या सूचनेत नमुद केले होते, त्यांच्या सूचना पुन्हा स्वीकारल्या. आणि बाकीच्यांच्या सूचना बाद करण्यात आल्या. त्यामुळे ज्यांनी पुन्हा या सूचना मांडल्या त्यांच्या पुढील एप्रिल महिन्यात विचारात घेण्यात आल्या आणि नव्यानेही मांडण्यात आल्या. यामध्ये एप्रिल महिन्यात या ६६ सूचना महापालिका सभागृहाच्या पटलावर मांडण्यात आल्या होत्या. यासाठी १३ एप्रिलचा दिवस निश्चित करण्यात आला होता. परंतु याही दिवशी गानसम्राज्ञी आशाताई भोसले यांच्या निधनामुळे शोक प्रस्ताव मांडून सभेचे कामकाज तहकूब करण्यात आल्या. त्यामुळे यातील काही ठरावाच्या सूचना पुढील महिन्यात म्हणजे मे मध्ये विचारात घेण्यात आल्या. त्यामुळे मे महिन्यात महापालिकेच्या पटलावर १४४ तसेच अतिरिक्त ०८ अशाप्रकारे एकूण १५२ ठरावाच्या सूचना मांडण्यात आल्या होत्या. यातील ७२ ठरावाच्या सूचना या मे महिन्यात नव्याने मांडण्यात आल्या होत्या. यासाठी मे महिन्यातील ०७ तारीख ही ठरावाच्या सूचना विचारात घेण्यासाठी निश्चित करण्यात आली होती. परंतु व्हिएतनामचे पंतप्रधान येणार असल्याने महापौरांनी ०७ मे रोजी निश्चित केलेल्या सभागृहाचे कामकाज रद्द केले. त्यामुळे निश्चित केलेल्या ठरावाच्या सूचनांच्या दिवशी कामकाज न झाल्यास त्या दिवशी असलेल्या सर्व ठरावाच्या सूचना बाद होतात. त्यानुसार पटलावर ठेवण्यात नगरसेवकांनी मांडलेल्या १५२ ठरावाच्या सूचना बाद झाल्या आहेत. सलग तिसऱ्या महिन्यांमध्ये ठरावाच्या सूचनांदिवशी कामकाज न झाल्यामुळे ठरावाच्या सूचना बाद होण्याची हॅट्रीक महापालिकेने साधली असून अशाप्रकारे सलग तिन वेळा ठरावाच्या सूचनांच्या दिवशी कामकाज न होण्याचे प्रकार महापालिकेच्या इतिहासात प्रथमच घडत असल्याचे बोलले जात आहे.