पश्चिम बंगाल : भारताचा माजी क्रिकेटपटू आणि तृणमूल काँग्रेसचे नेते मनोज तिवारी यांनी मंगळवारी पक्षाला रामराम ठोकला. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी पक्षावर गंभीर आरोप करत, तिकीटासाठी मोठ्या रकमेची मागणी होत असल्याचा दावाही केला आहे.
मनोज तिवारी यांनी आरोप केला की, या निवडणुकीत अनेक उमेदवारांनी तिकीट मिळवण्यासाठी मोठी रक्कम दिली. ज्यांच्याकडे भरपूर पैसा होता, त्यांनाच तिकीट मिळाले. यावेळी किमान ७० ते ७२ उमेदवारांनी प्रत्येकी सुमारे ५ कोटी रुपये दिले. माझ्याकडूनही पैसे मागण्यात आले, पण मी नकार दिला, असे तिवारी म्हणाले. तिवारी हे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये क्रीडा राज्यमंत्री होते. मात्र, त्यांनी मंत्रीपदाबाबत नाराजी व्यक्त करत ते केवळ “नावापुरते” असल्याचे सांगितले. राज्यमंत्रीपद म्हणजे फक्त एक ‘लॉलीपॉप’ होते. कोणत्याही बैठकीत आमच्या मतांना महत्त्व दिले जात नसे, असा आरोपही त्यांनी केला. तिवारी यांनी टी एमसीमध्ये अंतर्गत लोकशाही नसल्याचा आरोपही केला. मी बैठकीत प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला, तर मध्येच थांबवले जायचे. ‘माझ्याकडे वेळ नाही’ असे सांगितले जायचे, असेही त्यांनी सांगितले. याशिवाय, हावडा जिल्ह्यातील ड्रेनेज आणि सांडपाणी व्यवस्थेच्या समस्येकडेही लक्ष वेधले. मी वारंवार प्रयत्न करूनही या समस्यांचे निराकरण झाले नाही. स्थानिक प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले, असा आरोप त्यांनी केला.