Jharkhand Crime : झारखंडची राजधानी रांचीमध्ये नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एका ५० वर्षाच्या महिलेची हत्या करण्यात आली आहे. आणि धक्कादायक म्हणजे ही हत्या तिच्याच मुलीने केली आहे. या प्रकरणात महिलेच्या अल्पवयीन मुलीसह तिचा बॉयफ्रेंडसह आणि अन्य दोन जणांना देखील ताब्यात घेण्यात आलं आहे. या हत्येचं कारण तर संतापजनक आहे हे कारण बॉयफ्रेंडवर पैसे उडवण्यासाठी ती आईकडून पैसे घ्यायची , यापूर्वी तिने बॉयफ्रेन्डवर लाखो रुपये उडवले होते, हे आईला समजल्यानंतर आईने तिला पैसे देण्यास नकार दिला. आणि याच कारणातून या कारणातून अल्पवयीन मुलीने आईची हत्या केलीय. (Daughter Killed Mother)
मृत महिलेचे नाव नाहिदा परवीन असे असून त्या रांचीच्या डोरंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मनीटोला भागात रहात होत्या. त्यांची हत्या २४ एप्रिल रोजी करण्यात आली होती. २६ एप्रिलला मृत महिलेच्या दीराने संबंधित महिलेच्या मृत्यू संशयास्पद वाटल्याने पोलिसाना कळवले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली. तपासात अनेक गोष्टींचा उलगडा झाला अन् पोलिसांनी बिहारमधील गया जिल्ह्यातील दोन लोकांना अटक केली. यात अल्पवयीन मुलगी आणि तिचा कथित बॉयफ्रेंड अरबाज खान याचा देखील समावेश होता.
प्रियकरासाठी आईची हत्या
तपासादरम्यान पोलिसांना धक्कादायक माहिती समजली. अल्पवयीन मुलीने आपला गुन्हा कबूल केला आहे. तिने सांगितले की मी आईकडून पैसे मागत होते. मात्र आईने पैसे देण्यास नकार दिला होता. अल्पवयीन मुलगी आपल्या बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार होती. त्याच्यावर तिने मोठा पैसा खर्च केला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलीने आपल्या बॉयफ्रेंडला आधीच पाच लाख रूपये दिले होते.ज्यावेळी आईला याची माहिती मिळाली तिने पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर मुलीने आपल्या बॉयफ्रेंड आणि त्याच्या तीन मित्रांसोबत मिळून आईचीच हत्या करण्याचा कट रचला. २४ एप्रिल रोजी सर्वांनी मिळून नाहिदा परवीनला उशीने तोंड दाबून खून केला. यानंतर दोन दिवसांनी २६ एप्रिल रोजी मृतदेह डोरंडाच्या एका कब्रिस्तानमध्ये दफन केला.
मंगळवारी पोलिसांनी मॅजिस्ट्रेटच्या उपस्थितीत पुन्हा कबर खोदली अन् नाहिदा यांचा मृतदेह बाहेर काढला. तपासात मृत नाहिदा यांच्या गळ्यावर जखमेचे व्रण आढळून आले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाटी पाठवण्यात आला. पोलिसांनी सांगितलं की या प्रकरणाचा तपास सुरू असून या हत्येत सामील असलेल्या इतर आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेमुळं संपूर्ण भागातील लोकांना धक्का बसला आहे.