बॉर्डरलेस बाबासाहेब आंबेडकर प्रदर्शनाचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली माती, जोडते दलित सवर्णांची नाती अशी काव्यमय सुरुवात करुन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बॉर्डरलेस बाबासाहेब आंबेडकर या प्रदर्शनाचे उद्घाटन केले. मुंबईत रविंद्र नाटय मंदिर येथे बॉर्डरलेस बाबासाहेब प्रदर्शनात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोलंबिया विद्यापीठ अमेरिका, लंडन, महु मध्यप्रदेश, आंबेटेंबे मुरबाड, आंबडवे मंडनगड, सोलापुर, पुणे, कोल्हापुर, हैद्राबाद, आग्रा, नेपाळ आदि ऐतिहासिक स्थळावरील मातीचे संकलन करुन या प्रदर्शनात ठेवण्यात आलेले आहे. बॉर्डरलेस बाबासाहेब या प्रदर्शनाचे प्रमुख डॉ. राजेंद्र जाधव यांनी या सर्व स्थळांवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मातीचे संकलन करुन या प्रदर्शनात प्रदर्शित केलेले आहे. या प्रदर्शनाचे रामदास आठवले यांनी कौतुक केले.
बॉर्डरलेस बाबासाहेब या प्रदर्शनात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रांचेही प्रदर्शन करण्यात आले आहे. ही तैलचित्रे आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिव्यांग चित्रकार नितीन खरात यांनी काढलेले आहेत. या प्रदर्शनात १५३ देशांचे राष्ट्रीय ध्वजही प्रदर्शित करण्यात आलेले आहेत. शिल्पकार आतिष पालवनकर यांनी साकारलेली शाई पेनाची निप पाहण्यासारखी आहे.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कर्तृत्व आणि विचार यांना कोणत्याही देशाच्या सीमा (बॉर्डर) रोखू शकत नाहीत. त्यामुळे या प्रदर्शनाला बॉर्डरलेस बाबासाहेब हे नाव समर्पक असल्याचे कौतुक केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष सिध्दार्थ कासारे, जिल्हा अध्यक्ष संजय पवार, संयोजक राजेंद्र जाधव, प्रा. हेमंत सामंत, पत्रकार कुणाल कांबळे, सोनबा येलवे यांचे नातु सदानंद येलवे, विजय सुराडकर, डॉ. वैभव देवगीरकर आदि अनेक मान्यंवर यावेळी उपस्थित होते.






