Monday, April 13, 2026

Mumbai Local : आता पश्चिम रेल्वेचा प्रवास होणार अधिक सोयीस्कर, लवकरच या स्थानकांवर धावणार 15 डब्यांची लोकल

Mumbai Local : आता पश्चिम रेल्वेचा प्रवास होणार अधिक सोयीस्कर, लवकरच या स्थानकांवर धावणार 15 डब्यांची लोकल

मुंबई : पश्चिम रेल्वेचा प्रवास लवकरच अधिक सोयीस्कर होणार आहे. पश्चिम रेल्वेवरील विरार ते डहाणूदरम्यान १९९४ मध्ये उपनगरीय विभाग जाहीर झाल्यानंतर १६ एप्रिल २०१३ रोजी डहाणू-विरार-चर्चगेट बारा डब्यांची लोकल सेवा सुरू झाली होती. सध्या विरार-चर्चगेटदरम्यान १५ डब्यांच्या लोकल धावत असून आता लवकरच डहाणू ते चर्चगेट १५ डब्यांची सेवा सुरू करण्यासाठी स्थानकांवर आवश्यक बदल युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये 'कॉमन स्टॉप मार्क' तसेच प्रथम वर्ग, महिला आणि दिव्यांग डब्यांसाठी दिशादर्शक उभारण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे.

पश्चिम रेल्वेच्या सार्वजनिक बांधकाम (पीडब्ल्यूडी) विभागामार्फत सफाळा, केळवा रोड, पालघर, उमरोळी, बोईसर, वाणगाव आणि डहाणू रोड स्थानकांवर १५ डब्यांच्या गाड्या नेमक्या कुठे थांबतील यासाठी 'कॉमन स्टॉप मार्क' बसवण्याचं काम सुरू असून सफाळा स्थानकात फलाट क्रमांक १ वर सध्याच्या १२ डब्यांच्या थांब्यापासून उत्तर दिशेला सुमारे ६६ मीटर अंतरावर, तर फलाट क्रमांक २ वर विद्यमान मार्किंगपासून सुमारे १५ मीटर अंतरावर नवीन मार्क उभारले जात आहेत.

केळवा रोड स्थानकातही फलाट क्रमांक १ वर सुमारे ६६ मीटर अंतरावर हे काम सुरू असून पालघर स्थानकातील फलाट क्रमांक ३ वर उत्तर दिशेला सुमारे ६६ मीटर अंतरावर १५ डब्यांच्या लोकलसाठी मार्क उभारले जात आहेत. उमरोळी स्थानकात फलाट क्रमांक १ च्या उत्तर टोकाकडे, तर बोईसर स्थानकात फलाट क्रमांक १ वर सुमारे ४० मीटर अंतरावर हे काम अंतिम टप्प्यात आहे. वाणगाव स्थानकात फलाट क्रमांक २ वर सुमारे ६६ मीटर अंतरावर मार्किंग सुरू आहे.

डहाणू रोड स्थानकात फलाट क्रमांक २ च्या डाउन दिशेला तसेच फलाट क्रमांक ३ वर नवीन कॉमन स्टॉप मार्क उभारण्याचं काम सुरू आहे. या सर्व कामांनंतर प्रथम वर्ग, महिला आणि दिव्यांग डब्यांसाठी दिशादर्शकही बसवले जाणार आहेत. फलाटांवर प्रवाशांना पद पुलांचा उपयोग सोयीस्कर होईल, याचा विचार करूनच स्टॉप मार्क निश्चित केले जात असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले.

यासंदर्भात सर्व स्थानक अधीक्षकांना सूचना देण्यात आल्या असून दरम्यान, १० ते ११ एप्रिलदरम्यान हे काम पूर्ण करण्याचं नियोजन होतं. पण, १२ एप्रिलपर्यंतही काम पूर्ण झालं नसल्यानं डहाणू-चर्चगेट १५ डब्यांची सेवा किमान आठवडाभर लांबण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा