Monday, April 13, 2026

Hardik Pandya : मुंबईच्या पराभवाची हॅट्रिक; हार्दिक पंड्याच्या कॅप्टनशीवर दिग्गज खेळाडूंसह चहुबाजुंनी टीका

Hardik Pandya : मुंबईच्या पराभवाची हॅट्रिक; हार्दिक पंड्याच्या कॅप्टनशीवर दिग्गज खेळाडूंसह चहुबाजुंनी टीका

मुंबई : RCB ने वानखेडेच्या ऐतिहासिक मैदानावर दमदार खेळ करत Mumbai Indians ला १८ धावांनी पराभूत केले. या पराभवामुळे मुंबई इंडियन्सच्या नावावर सलग तिसरा पराभव नोंदवला गेला असून संघाची स्थिती पॉईंट टेबलमध्ये खालावली आहे. कर्णधार हार्दिक पंड्या Hardik Pandya याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, मात्र आरसीबीच्या फलंदाजांनी तो पूर्णपणे चुकीचा ठरवला. त्यामुळे पुन्हा एकदा पंड्याच्या कॅप्टनशीवर दिग्गजांकडून टीका होत आहे.

अनेक आंतरराष्ट्रीय दिग्गज खेळाडू असणाऱ्या आणि कागदावर सर्वात मजबूत संघांपैकी एक असलेल्या मुंबईने शेवटचे आयपीएल विजेतेपद २०२० मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली जिंकले होते. त्यानंतर हार्दिक पंड्या २०२४ मध्ये गुजरात टायटन्सकडून एका मोठ्या ट्रेडद्वारे मुंबईच्या संघात सामील झाला. गुजरातच्या संघाला त्याने २०२२ मध्ये त्यांच्या पहिल्या हंगामात विजेतेपद मिळवून दिले होते. मात्र गेल्या हंगामात आणि आताच्याही चालू हंगामात मुंबईच्या खराब कामगिरीमुळे हार्दिकच्या कॅप्टनशीवर अनेकांकडून टीका होता आहे.

भारताचा माजी फलंदाज श्रीकांत यांनी मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला नेतृत्वाची सूत्रे स्वतःहून सूर्यकुमार यादवकडे सोपवण्याचे आवाहन केले आहे. आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना, श्रीकांत यांनी हार्दिक, रोहित आणि सूर्या यांच्यासह संघ व्यवस्थापनाला एकत्र येऊन भविष्यासाठी एक स्पष्ट आराखडा ठरवण्याचे आवाहन केले. त्यांनी नेतृत्वाची परिस्थिती विचित्र असल्याचे म्हटले आणि विश्वचषक विजेते कर्णधार रोहित व सूर्यकुमार हे हार्दिकच्या नेतृत्वाखाली खेळत असल्याचे निदर्शनास आणून दिले.

श्रीकांत यांनी पुढे सांगितले की, सध्या संघात नेतृत्वाबाबत “विचित्र परिस्थिती” निर्माण झाली आहे, कारण दोन टी२० विश्वचषक विजेते कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव हे हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळत आहेत. त्यांच्या मते, व्यवस्थापनाने या परिस्थितीवर तातडीने तोडगा काढणे गरजेचे आहे.

त्यांनी पुढे असे सुचवले की, या वर्षी सूर्यकुमार यादवला कर्णधार म्हणून संधी देऊन पाहावी, ज्यामुळे संघाच्या कामगिरीत बदल होतो का हे तपासता येईल. अधिकृत बदल लगेच जाहीर करण्याची गरज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

श्रीकांत यांच्या मते हार्दिक चांगला कर्णधार आहे, मात्र संघाच्या हितासाठी त्याने स्वतः पुढाकार घेऊन नेतृत्व सूर्यकुमार यादवकडे सोपवण्याचा विचार करावा. “हार्दिकने स्वतः पुढे येऊन ‘सूर्याने नेतृत्व करावे आणि मी त्याला साथ देईन’ असे म्हटले, तर हा प्रश्न सहज सुटू शकतो,” असेही त्यांनी नमूद केले.

तसेच भारतीय संघाचा माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याने देखील कर्णधार हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीतील निर्णयांवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. आपल्या यूट्यूब चॅनलवरील व्हिडिओमध्ये बोलताना अश्विनने २०२४ मधील हैद्राबाद आणि बंगळुरू यांच्या सामन्याचा संदर्भ देत काही महत्त्वाच्या चुकांकडे लक्ष वेधले.

अश्विनने सांगितले की त्या सामन्यात रजत पाटीदारने फिरकी गोलंदाज मयंक मार्कंडे (Mayank Markande) याच्यावर जोरदार हल्ला करत चार षटकार ठोकले होते. त्यानंतरही मुंबई इंडियन्सने (MI) पाटीदारच्या फलंदाजीचा विचार न करता मार्कंडेला पुन्हा गोलंदाजी दिली, हा निर्णय योग्य नव्हता.

“पाटीदार फिरकीविरुद्ध अत्यंत आक्रमक फलंदाज आहे, हे माहित असूनही त्याला मार्कंडे दिला गेला, हा स्मार्ट निर्णय नव्हता,” असे अश्विन म्हणाला. त्याने पुढे सांगितले की पाटीदारने त्याच गोलंदाजाविरुद्ध पुन्हा एकदा सुरुवातीपासूनच जोरदार फटकेबाजी केली.

या सामन्यात मार्कंडेने दोन षटकांत तब्बल ४० धावा दिल्या, तर दुसरा फिरकीपटू मिचेल सँटनर (Mitchell Santner) यालाही ४३ धावा मोजाव्या लागल्या. एकूणच मुंबईच्या फिरकी गोलंदाजांनी सहा षटकांत ८३ धावा दिल्याने सामन्याचे चित्र बदलले, असे अश्विनने नमूद केले.

त्याच्या मते, अशा चुकीच्या गोलंदाजी बदलांमुळे संघाला २१० आणि २४० धावांमधील फरक सहन करावा लागतो, जो अखेरीस सामन्याचा निकाल ठरवतो.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा