Monday, April 13, 2026

Asha Bhosle : इंडस्ट्रीतल्या स्ट्रगलचा बाहू करणाऱ्यांना आशा भोसलेंनी सुनावले 'हे' खडे बोल

Asha Bhosle : इंडस्ट्रीतल्या स्ट्रगलचा बाहू करणाऱ्यांना आशा भोसलेंनी सुनावले 'हे' खडे बोल

जुना व्हिडीओ पुन्हा होतोय वायरल

मुंबई : भारतीय संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध पार्श्वगायिका गायिका आशा भोसले यांचं निधन झालं आहे. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आशा भोसले त्यांच्या निधनानंतर, त्यांच्या अनेक जुन्या मुलाखती आणि वक्तव्य पुन्हा एकदा व्हायरल होत आहेत. अशातच एका मुलाखतीत आशा भोसले (Asha Bhosle) यांनी या क्षेत्रात काम मिळत नसल्याचं रडगाणं म्हणून दाखवणाऱ्यांना तिखट शब्दांत उत्तर दिलं आहे. दिग्गज गायिका आशा भोसले यांनी म्हटलंय की, "ज्याला आपल्या कलेचं खरं ज्ञान असतं, अशी कोणतीही व्यक्ती कधीच अशी तक्रार करत नाही की, कोणीतरी आपल्याला गाण्यापासून रोखतंय किंवा आपल्या कामात अडथळा निर्माण करतायत... ज्यांच्याकडे कौशल्य असतं, त्यांच्याकडे आत्मविश्वासही असतोच... तुम्ही कधी असं ऐकलंय का? किंवा कोणत्याही वर्तमानपत्रात वाचलंय का? की, लता किंवा आशा यांनी अशी तक्रार केलीय की, कोणीही त्यांना गाण्याच्या संधी देत ​​नाहीय? तुम्हाला असं वाटतं का की, आम्हाला संघर्षाचा सामना करावा लागला नाही किंवा आम्ही कठोर परिश्रम केले नाहीत? आम्ही अत्यंत कठोर परिश्रम केलेत, तरीही आम्ही कधीच अशी तक्रार केली नाही की, कोणीही आम्हाला गाण्याची परवानगी देत ​​नाहीय किंवा काम देत नाहीय. गोष्टी तशा चालतच नाहीत. हिरा हा शेवटी चमकणारच असतो... त्याचप्रमाणे, जर आपल्याकडे गुणवत्ता असेल, तर आपल्याला काम नक्कीच मिळेल..." आशा भोसले यांनी पुढे म्हटलंय की, "जर मी तुम्हाला सांगितलं की, उद्या जेवण करू नका, तर तुम्ही खरोखरंच जेवण करणं टाळाल का? तुम्हाला असं वाटतं का की, केवळ आम्ही असं सांगितलं म्हणून, एखादा संगीत दिग्दर्शक इतर गायकांना गाणी देण्यास नकार देईल? अर्थातच ते त्यांना काम देतील, हे 'शो बिझनेस'चं जग आहे आणि यात सहभागी असलेली प्रत्येक व्यक्ती सतत काहीतरी नवीन शोधण्याच्या प्रयत्नात असते. जर त्यांना काहीतरी ताजं आणि नाविन्यपूर्ण गवसलं, तर ते क्षणाचाही विलंब न करता त्या गायकांना काम देतात..."
 
View this post on Instagram
 

A post shared by Femina (@feminaindia)

आशा भोसले यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रचंड संघर्ष केला आणि अथक परिश्रम घेतले. त्यांनी अगदी लहान वयातच गायनाला सुरुवात केली होती. सुरुवातीच्या काळात, प्रस्थापित गायकांनी नाकारलेली गाणीच त्यांना गाण्यासाठी दिली जात असतं. मात्र, त्यांनी याच गाण्यांचं रूपांतर आपल्या सर्वात मोठ्या सामर्थ्यात केलं.
हळूहळू, सिनेमांची गाणी, गझल, पॉप आणि शास्त्रीय संगीत अशा संगीताच्या प्रत्येक प्रकारात त्यांनी आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यांनी आपल्या परिस्थितीबद्दल कधीच तक्रार केली नाही. उलट, त्यांनी आपल्या कामालाच स्वतःबद्दल बोलू दिलं. त्यांच्या निधनानंतर, सर्वजण त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत आणि त्यांच्या गाण्यांची आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत. त्यांच्या निधनानं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Comments
Add Comment