Sunday, April 12, 2026

Shantecha Karta Chalu Aahe : लक्ष्मीकांत बेर्डे सर.. लक्ष असू द्या! प्रियदर्शन जाधवची भावूक पोस्ट

Shantecha Karta Chalu Aahe  : लक्ष्मीकांत बेर्डे सर.. लक्ष असू द्या! प्रियदर्शन जाधवची भावूक पोस्ट

मुंबई : मराठी रंगभूमीवर प्रचंड गाजलेलं विनोदी नाटक 'शांतेचं कार्ट चालू आहे' पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या १९८३ मध्ये रंगभूमीवर आलेल्या नाटकानं त्या काळात प्रचंड यश मिळवलं होतं . लक्ष्मीकांत बेर्डे, सुधीर जोशी, नयनतारा आणि लाली जोग यांच्या अभिनयामुळे हे नाटक विशेष गाजलेलं. पण कोरोनाच्या काळात थांबलेलं हे नाटक २१७ प्रयोगांनंतर पुन्हा नव्या जोमात सादर केलं जात आहे. शनिवार ११ एप्रिल २०२६ रोजी प्रभादेवीमधील रवींद्र नाट्य मंदिरात या नाटकाचा प्रयोग झाला.

या प्रयोगाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. दरम्यान, अभिनेता प्रियदर्शन जाधवनं (Priyadarshan Jadhav) देव्हाऱ्यात लक्ष्मीकांत बेर्डे यांचा फोटो ठेवत एक खास पोस्ट शेअर केलीये. 'लक्ष्मीकांत बेर्डे सर लक्ष असू द्या ! तुमच्यासारखेच आमच्यावरसुद्धा प्रेक्षक प्रेम करतील आणि शांतेचं कार्ट चालूच राहील अशी आशा बाळगतो' असं त्यानं या पोस्टमध्ये लिहिलं आहे. या पोस्टची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.

"शांतेचं कार्ट चालू आहे हे नाटक १९८३ साली रंगभूमीवर आलं. या नाटकानं त्या काळात रंगभूमीवर धुमाकूळ घातला. लक्ष्मीकांत बेर्डे, सुधीर जोशी, नयनतारा, लाली जोग यांनी त्यांच्या भूमिका अजरामर केल्या. नाटक तुफान गाजलं. श्रीनिवास भणगे लिखित आणि " प्रकाश बुद्धीसागर " दिग्दर्शित हे नाटक सुपरहिट ठरलं. बुद्धीसागर काय कमाल करू शकतात हे या नाटकानं सिद्ध झालं आणि पुढे त्यांनी अनेक सुपरहिट नाटके दिग्दर्शित केली.

प्रियदर्शनने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की,

आज त्याच नाटकाचा नव्यानं प्रयोग होत आहे. तब्बल २१७ प्रयोग केल्यानंतर कोरोनामुळे नाटक बंद पडलं. आता नाटक पुन्हा नव्या दमाने सुरू होत आहे. लक्ष्मीकांत बेर्डे इतकं धमाकेदार काम मला करताच येणार नाही पण तरीही जमेल तेवढं उत्तम करायचा प्रयत्न करेन.

#लक्ष्मीकांत बेर्डे सर.... लक्ष असू द्या ! तुमच्यासारखेच आमच्यावर सुद्धा प्रेक्षक प्रेम करतील आणि शांतेचं कार्ट "चालूच" राहील अशी आशा बाळगतो. बाकी................. मजेत !"

प्रेक्षकांना नम्र विनंती : खळखळून हसायचं असेल..... तर कार्ट चालूच आहे !

कुटुंबातील छोट्या-मोठ्या प्रसंगांमधून उलगडणारे नातेसंबंध, त्यातील गंमत - जंमत, गैरसमज आणि आपुलकी असे हलकेफुलके मनोरंजन या नाटकातून होते. त्यामुळेच हे नाटक प्रेक्षकांना हसवतानाच आपलंसंही वाटतं. पूर्णपणे कौटुंबिक स्वरूपाचं असल्यामुळे, हे नाटक सगळ्यांनी एकत्र बसून पाहाण्यासारखं आहे. त्यामुळे या नाटकाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा