Sunday, April 12, 2026

Census : जनगणना २०२६ च्या कार्यक्रमाची जबाबदारी अभियंत्यांच्या खांद्यावर?

Census : जनगणना २०२६ च्या कार्यक्रमाची जबाबदारी अभियंत्यांच्या खांद्यावर?

अत्यावश्यक कामे पुरी करायची की जनगणना?, अभियंत्यांकडून केला जात आहे सवाल

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : आगामी भारतीय जनगणना २०२६ च्या कार्यक्रमासाठी मुंबईत जनगणनेला सुरुवात झाली असून यासाठी महानगरपालिकेतील अभियंता संवर्गातील अधिकाऱ्यांवरही जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. एका बाजुला पावसाळ्यापूर्वी नालेसफाई, रस्ते, मलनि:सारण वाहिन्या, सांडपाणी प्रक्रिया केंद्र, घनकचरा व्यवस्था आदींचे काम प्राधान्याने पूर्ण करणे आवश्यक असतानाच अशाप्रकारच्या जनगणनेच्या कामांसाठी महापालिका अभियंत्यांना जुंपवले जात असल्याने अभियंत्यांच्या संघटनांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

म्युनिसिपल इंजिनिअर्स असोसिएशनच्यावतीने महापालिका आयुक्त आश्विनी भिडे ०८ एप्रिल रोजी निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनामध्ये इंजिनिअर्स असोशिएशनने असे नमुद केले आहे की, मुळातच महापालिकेतील अभियंत्यांची मोठ्या प्रमामावर पदे गेली अनेक वर्षे रिक्त आहेत. सध्या जवळपास १८० कार्यकारी अभियंत्यांची पदे रिक्त असून, त्याचप्रमाणे इतर अभियंता पदांमध्येही मोठ्या प्रमाणात तूट आहे. उपलब्ध मनुष्यबळावरच संपूर्ण मुंबई शहरातील विकासकामे, पायाभूत सुविधा, तसेच दैनंदिन देखभाल यांचा मोठा ताण आहे.

अलिकडेच महापालिका निवडणुकांमुळे काही काळ विकासकामांमध्ये खंड पडला होता. सध्या उपलब्ध अभियंते प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. याशिवाय, येणाऱ्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नालेसफाई, गटार सफाई, रस्ते दुरुस्ती, जल वितरण, मलनिःसारण व्यवस्था, घन कचरा व्यवस्थापन आदी अत्यंत महत्त्वाच्या कामांची जबाबदारीही अभियंत्यांवर आहे. ही सर्व कामे वेळेत व प्रभावीपणे पूर्ण करणे अत्यावश्यक आहे.

पण अशा परिस्थितीत, जनगणनेसारख्या मोठ्या आणि वेळखाऊ प्रक्रियेसाठी अभियंत्यांची नियुक्ती करणे हे प्रशासनिकदृष्ट्या योग्य ठरणार नाही, तसेच त्यामुळे शहराच्या अत्यावश्यक विकासकामांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे,असल्याचे सांगत भीती वर्तवली आहे.

असोशिएशनचे कार्याध्यक्ष रमेश भूतेकर-देशमुख यांनी या निवेदनाच्या माध्यमातून प्रशासनाला विनंती करत, भारतीय जनगणना २०२६ च्या कार्यक्रमातून महापालिका अभियंता संवर्गास पूर्णतः वगळण्यात यावे, जेणेकरून ते आपली मूलभूत जबाबदारी प्रभावीपणे पार पाडू शकेल,असे म्हटले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा