नवनाथ बन यांचा सवाल; लव्ह जिहाद, लांगुलचालनावरून विरोधकांवर टीका
मुंबई : "वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारांची घुसखोरी झाल्याची चिंता व्यक्त करणाऱ्या शरद पवार यांनी, याच संप्रदायात शिरकाव केलेल्या 'अर्बन नक्षलवाद्यां'वरही कधीतरी बोलावे. या घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी पवारांकडे काय योजना आहे आणि त्यांची संख्या किती, हे त्यांनी एकदा महाराष्ट्रासमोर स्पष्ट करावे," असे आव्हान भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शनिवारी दिले. भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका करताना बन म्हणाले, "राहुल गांधी हे औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष आहेत असे वाटत असल्यानेच वडेट्टीवार अफजल खानाच्या दाढ्या कुरवळण्याचे काम करत आहेत. खरात याने केलेल्या कृत्याबद्दल कारवाई करण्याची हिंमत काँग्रेस सरकारमध्ये झाली नसती. राज्यात महायुतीचे सरकार आणि देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत, म्हणूनच तत्काळ कारवाई झाली," असा दावा त्यांनी केला.






