मुंबई (विशेष प्रतिनिधी) : कोणत्याही परिस्थितीत एकही मनुष्य प्रवेशिका अर्थात गटाराची झाकणे उघडी राहणार नाही, याची कटाक्षाने काळजी घ्यावी. पावसाळ्यापूर्वी प्रवेशिकांना जाळ्या लागायलाच हव्यात. जेणेकरुन, कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही. दरम्यान, मुंबईत मोठ्या प्रकल्पांची कामे सुरू असताना महानगरपालिकेच्या विविध सेवा-सुविधा वाहिन्या सुस्थितीत असल्याची खात्री संबंधित अधिकाऱ्यांनी करून घ्यावी, असे निर्देश महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी संबंधित खाते आणि सर्व विभागाच्या सहायक आयुक्तांना दिले आहेत.
मुंबई महानगरपालिकेच्या सर्व विभागांची मासिक आढावा बैठक शनिवारी ११ एप्रिल २०२६ रोजी महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी महानगरपालिका मुख्यालयात आयोजित केली होती. यावेळी झालेल्या बैठकीत महापालिका आयुक्तांनी हे निर्देश दिले आहे. यावेळी झालेल्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, सह आयुक्त (दक्षता) डॉ. एम. देवेंदर सिंह यांच्यासह सर्व सह आयुक्त, उप आयुक्त, सहायक आयुक्त, खाते प्रमुख आदी या बैठकीस उपस्थित होते.
यावेळी झालेल्या बैठकीत लहान-मोठ्या नाल्यांतील गाळ काढण्याचे काम वेगाने सुरू आहे. याचा प्रशासकीय विभागनिहाय (वॉर्ड) आढावा घेण्यात आला. यावेळी आश्विनी भिडे म्हणाल्या, नाल्यांतून गाळ काढण्याची कामांची सद्यस्थिती माननीय नगरसेवक, लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांपर्यंत दैनंदिन स्वरुपात पोहोचवावी. जेणेकरुन, त्यांना दैनंदिन कामाची स्थिती कळेल. त्यावर त्यांच्या काही सूचना असतील तर त्याही प्रशासनापर्यंत पोहोचतील. तसेच, नाले स्वच्छतेची माहिती महानगरपालिका समाजमाध्यमांद्वारे नागरिकांच्या माहितीसाठी प्रसारित करावे.
पाणी साचण्याच्या दीर्घकालीन उपाययोजनेसाठी आतापासूनच आराखडा तयार करा
पावसाळा पूर्वतयारी आणि उपाययोजनांबाबत बैठकीत चर्चा झाली. यामध्ये पाणी साचण्याचे संभाव्य ठिकाण, पाणी उपसा करणारी यंत्रणा, पंप आणि अन्य उपकरणांची सुसज्जता यावर विचारविनिमय करण्यात आले. याबाबत महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी सांगितले की, पाणी साचण्याच्या ठिकाणी महानगरपालिकेकडून कायमच सुसज्जता असते. तरीही, अशा ठिकाणी दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी आतापासूनच आराखडा तयार करावा. त्यावर, यंदा अंमलबजावणी होणे शक्य नसले तरी पुढील वर्षी येणाऱ्या पावसाळ्यापूर्वीपर्यंत काम करता येईल. याबाबत कार्यपद्धती निश्चित करून त्यासाठी लागणारा कालावधी ठरवावा.
एकूण ७० टक्के पूर्ण झालेली रस्त्यांची कामे १ जूनपूर्वी पूर्ण व्हायलाच हवी
मुंबईतील रस्त्यांच्या कामांबाबत बैठकीत चर्चा झाली. त्यानंतर, आश्विनी भिडे म्हणाल्या, सध्या सुरू असलेली रस्त्यांची कामे सुमारे ७० टक्क्यांपेक्षा अधिक झाली असल्यास ती १ जूनपूर्वी पूर्ण झालीच पाहिजे. सुरू असलेली कामे दिलेल्या निश्चित केलेल्या मुदतीत पूर्ण करून वाहतुकीसाठी सुरळीत राहतील, याची दक्षता घ्यावी. रस्त्यांवरील खड्डयांच्या बाबतीत सकारात्मक निष्कर्ष असून मागील तीन वर्षांत खड्ड्यांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. तसेच, याबाबत होणारा खर्चही सातत्याने कमी होत आहे, असेही त्यांनी सांगितले.






