Saturday, April 11, 2026

Devendra Fadnavis and Narayan Rane : वाभाडे काढणं काय असतं, हे राणे साहेबांच्या भाषणातून शिकलो!" - देवेंद्र फडणवीसांनी जागवल्या विधानसभेतील आठवणी

Devendra Fadnavis and Narayan Rane : वाभाडे काढणं काय असतं, हे राणे साहेबांच्या भाषणातून शिकलो!

कणकवली : भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार नारायण राणे (NarayanRane) यांचा ७४ वा वाढदिवस सिंधुदुर्गाच्या भूमीत मोठ्या दिमाखात साजरा झाला. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी विशेष उपस्थिती लावली. यावेळी बोलताना फडणवीसांनी नारायण राणेंच्या विधानसभेतील दबदब्याचं सविस्तर वर्णन केलं. ते म्हणाले, "विधानसभेत विरोधकांचे वाभाडे काढणे म्हणजे नेमके काय, हे आम्हाला राणे साहेबांच्या अमोघ वक्तृत्वामुळे पाहायला मिळाले. त्यांचा दरारा इतका मोठा होता की, ते समोरच्या बाकावर असूनही आम्हाला कधीच त्यांच्याकडून त्रास झाला नाही, कारण ते मनाने कायम आमच्यासोबतच होते." राणेंच्या राजकीय शैलीचा हा गौरव सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

माझ्या संसदीय यशाचे श्रेय राणे साहेबांनाच!"

सिंधुदुर्गात पार पडलेल्या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या राजकीय जडणघडणीत खासदार नारायण राणे यांचा किती मोठा वाटा आहे, हे अत्यंत प्रांजळपणे कबूल केले. फडणवीस म्हणाले की, "मी १९९९ मध्ये जेव्हा पहिल्यांदा विधानसभा सभागृहात पाऊल ठेवले, तेव्हा राणे साहेबांसोबत काम करण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी एक मोठी पर्वणी होती. आज मला जे काही संसदीय यश मिळाले आहे, त्याचं संपूर्ण श्रेय राणे साहेबांसारख्या माझ्या नेत्यांना आणि त्यांच्या मार्गदर्शनाला जातं." राणे साहेबांनी केवळ प्रोत्साहनच दिले नाही, तर एक आदर्श लोकप्रतिनिधी कसा असावा, याचा वस्तुपाठच घालून दिला, अशा शब्दांत फडणवीसांनी कृतज्ञता व्यक्त केली.

पहिल्या भाषणानंतर राणे साहेबांची 'ती' चिठ्ठी आली अन्..." मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त बोलताना आपल्या राजकीय प्रवासातील एक अत्यंत खास आठवण शेअर केली. फडणवीस म्हणाले, "मी जेव्हा विधानसभेत पहिले भाषण केले, तेव्हा मला केवळ ७ मिनिटे मिळाली होती. मी खूप तयारी करून विषय मांडला. भाषण संपताच मला राणे साहेबांची एक चिठ्ठी आली, ज्यावर लिहिले होते, 'छान बोललास!' ती एक चिठ्ठी आमच्यातील अनेक वर्षांच्या ऋणानुबंधाची सुरुवात ठरली." राणे साहेबांनी तेव्हा दिलेली ती शाबासकी आजही स्मरणात असल्याचे सांगत फडणवीसांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तुमची दोन्ही मुलं तुमचा वारसा समर्थपणे चालवत आहेत. त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं आहे. त्यांचं भविष्य उज्ज्वल आहे, असे म्हणत त्यांनी नितेश राणे आणि निलेश राणे यांचे कौतुक केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा