'ऑपरेशन टायगर'ला पुन्हा वेग; ९ पैकी ८ खासदार हजर असल्याची चर्चा
मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'उबाठा' गटाला पुन्हा एकदा मोठा सुरुंग लावण्याची तयारी सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांपासून थंडावलेले 'ऑपरेशन टायगर' पुन्हा सक्रीय झाले असून, बुधवारी रात्री ठाण्यात शिंदे आणि 'उबाठा' गटाच्या तब्बल आठ खासदारांमध्ये गुप्त बैठक झाल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा नेहमीच्या मार्गावरून जात असताना अचानक वळवण्यात आला. शिंदेंनी सुरक्षा ताफा सोडून ठाण्यातील व्होल्टास कंपनी परिसरात 'उबाठा'च्या खासदारांची भेट घेतली. या बैठकीला खासदार श्रीकांत शिंदे हेदेखील उपस्थित होते. मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत चाललेल्या या प्रदीर्घ चर्चेत खासदारांना शिवसेनेत सहभागी होण्यासाठी मोठी 'ऑफर' देण्यात आल्याचे समजते.
या बैठकीला अरविंद सावंत, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि राजाभाऊ वाजे हे प्रत्यक्ष हजर होते, तर ओमराजे निंबाळकर यांच्यासह दोन खासदारांनी व्हिडिओ कॉलद्वारे सहभाग नोंदवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच उबाठा गटाने खासदारांची बैठक घेऊन त्यांचा कल जाणून घेतला होता. त्यानंतर ही घडामोड घडल्याने 'उबाठा' गोटात चिंतेचे वातावरण आहे.
खासदारांकडून वृत्ताचे खंडन
- दुसरीकडे, चर्चेत नाव असलेल्या सर्वच खासदारांनी ही बातमी फेटाळून लावली आहे. "मी काहीही झाले तरी शिंदेंसोबत जाणार नाही. अशा कोणत्याही बैठकीचे वृत्त चुकीचे आहे", अशी प्रतिक्रिया अरविंद सावंत यांनी दिली. ओमराजे निंबाळकर म्हणाले, "माझ्या दोन टर्मपासून हीच चर्चा सुरू आहे. बैठकीचे फोटो असतील तर समोर आणावेत, उगीच अफवा पसरवू नका." - "मला ना निमंत्रण होते, ना मी गेलो. मी प्रत्यक्ष किंवा ऑनलाइन, कोणत्याही प्रकारे बैठकीत नव्हतो", असे संजय देशमुख यांनी सांगितले. तर,"आम्ही पुण्यात किंवा आपापल्या क्षेत्रात होतो. पक्षांतराचा कोणताही विषय सध्यातरी नाही", अशी प्रतिक्रिया नागेश पाटील आष्टीकर व संजय जाधव यांनी दिली.
राजकीय भूकंप होणार?
दिल्लीतील नेतृत्वाने हिरवा कंदील दिला नसल्याच्या चर्चा सुरू असतानाच, उपमुख्यमंत्री शिंदेंनी पडद्यामागे हालचाली वाढवल्या आहेत. जर हे आठ खासदार खरोखरच शिंदेंच्या संपर्कात असतील, तर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे.






