Thursday, April 9, 2026

Ashok Kharat : 'लक्ष्मण' ते भोंदूबाबा 'अशोक खरात'; ४० वर्षांपूर्वीच गावकऱ्यांनी दिला होता बेदम चोप!

Ashok Kharat : 'लक्ष्मण' ते भोंदूबाबा 'अशोक खरात'; ४० वर्षांपूर्वीच गावकऱ्यांनी दिला होता बेदम चोप!

अहिल्यानगर : महिलांच्या लैंगिक शोषणाप्रकरणी सध्या तुरुंगात असलेल्या अशोक खरात याच्या कृत्यांची मुळं चाळीस वर्षांपूर्वीच रोवली गेली होती, अशी धक्कादायक माहिती तपासातून समोर आली आहे. सिन्नरच्या तांदळवाडीत जन्मलेला आणि दहावीत नापास झालेला एक सामान्य तरुण, पुढे लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेत कसा 'ब्रम्हांडशास्त्रज्ञ' बनला, याचा थक्क करणारा इतिहास उजेडात आला आहे.

पहिली शिकार आणि गावकऱ्यांचा चोप

दहावीत अपयशी ठरल्यानंतर अशोक खरात अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील आपल्या नातेवाईकांकडे गेला होता. तिथेच त्याने भोंदूगिरीचे पहिले दुकान थाटले. सुरुवातीच्या काळातच त्याने गावातील एका महिलेला आपल्या जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार केले होते. मात्र, गावकऱ्यांना या कृत्याचा सुगावा लागताच त्यांनी खरातला बेदम चोप दिला होता. याच मारहाणीनंतर भीतीपोटी तो गावातून पळून गेला आणि पुढील १५ वर्षे अज्ञातवासात राहिला.

काळ्या जादूतून 'ब्रम्हांडशास्त्रा'चा अवतार

अज्ञातवासात असताना खरातने बंगालमध्ये काही काळ वास्तव्य करून 'काळी जादू' आत्मसात केल्याचे बोलले जाते. काही वर्षांनंतर जेव्हा तो परतला, तेव्हा त्याने स्वतःला 'कॅप्टन' आणि 'ब्रम्हांडशास्त्रज्ञ' अशा पदव्या लावून घेतल्या. परदेशात जाऊन आल्याचा बनाव रचून १९९५ मध्ये त्याने सिन्नरच्या मिरगाव परिसरात आपले बस्तान मांडले. एका शेतकऱ्याची जागा बळकावून तिथे मंदिर उभारले आणि हळूहळू आपला प्रभाव वाढवण्यास सुरुवात केली.

अधिकारी आणि राजकीय वरदहस्ताने जमिनींची लूट

अशोक खरातच्या तथाकथित दरबारात केवळ सामान्य भक्तच नव्हे, तर बडे अधिकारी आणि राजकीय नेत्यांचीही उठबस वाढली होती. याच प्रभावाचा वापर करून त्याने अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी हडप केल्या. बनावट अधिकारी पाठवून लोकांना भीती दाखवणे आणि त्यांच्याकडून पैसे उकळणे हा त्याचा रोजचा धंदा बनला होता. या सर्व आडोशाखाली त्याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे आता उघड होत आहे.

वेळेत कारवाई झाली असती तर...

जर ४० वर्षांपूर्वी त्याने पहिल्या महिलेवर अत्याचार केला होता, तेव्हाच त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली असती, तर आज 'खरात फाईल्स'सारखा भीषण प्रकार घडलाच नसत्ता. वयाच्या २० व्या वर्षीच त्याला बेड्या पडल्या असत्या, तर गेल्या चार दशकांत शेकडो निष्पाप लोक त्याच्या भोंदूगिरीचे आणि शोषणाचे बळी ठरले नसते, अशी हळहळ आता व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >