- गारगाई पाणी प्रकल्पाला महापालिकेची मंजुरी, बहुमताच्या जोरावर प्रस्ताव मंजूर
मुंबई (विशेष प्रतिनिधी)
मुंबईकरांना सध्या पाण्याची समस्या भेडसावत असून मागणी आणि तफावत यामध्ये सुमारे ६०० दशलक्ष लिटर पाण्याची कमतरता आहे. त्यामुळे मुंबईची पाण्याची गरज भागवण्यासाठी गारगाई पाणी प्रकल्पाला गती देताना स्थायी समितीमध्ये मंजुरी दिल्यानंतर गुरुवारी महापालिका सभागृहातही मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, गारगाई पाणी प्रकल्पाच्या प्रस्तावाला उबाठाने विरोध केला असून महायुतीने बहुमताच्या जोरावर याप्रकल्पाला मंजुरी दिली. त्यामुळे समुद्राच्या पाण्याचे गोडे करण्याच्या प्रकल्प कामाला गती देतानाच गारगाई पाणी प्रकल्पालाही गती देण्याचा प्रयत्न होत असताना उबाठाने गारगाईला विरोध करत एकप्रकारे मुंबईकरांना अतिरिक्त ४४० दशलक्ष लिटर पाणी मिळवून द्यायचे नाही अशी भूमिका घेतल्याचे स्पष्ट दिसून आले.
गारगाई पाणी प्रकल्पाला मंजुरी देण्याचा प्रस्ताव महापालिका सभागृहात आला असता उबाठाचे यशोधर फणसे यांनी समुद्राचे पाणी गोडे करण्याच्या प्रकल्पाला महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण यांची मंजुरी मिळाली आहे आणि आता केंद्र सरकारची मंजुरी बाकी आहे. त्यामुळे या प्रकल्प कामाला सुरुवात होणार असल्याचे सांगत हा प्रकल्प सहा वर्षांमध्ये पूर्ण होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पातून पाणी मिळणार असेल गारगाई पाणी प्रकल्पाची गरज का असा सवाल तर गारगाईच्या मंजुरीचा प्रस्ताव फेरविचारासाठी पाठवण्याची मागणी फणसे यांनी केली. या प्रकल्पात तीन लाख झाडे कापण्यात येणार असल्यामुळे याला आमचा विरोध असल्याचेही फणसे यांनी सांगितले. याला काँग्रेसचे अश्रफ आझमी यांनी समर्थन दिले. तर भाजपचे प्रविण छेडा यांनी हा प्रस्ताव उबाठा शिवसेनेची सत्ता असतानाच २०१९मध्ये आणला गेला होता आणि त्यावेळी महापौर आपलाच होता असा सवाल उबाठाला करत झाडे कापली नाही तर पुनर्रोपित केली जाणार आहेत तर प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करताना ५ पट नुकसान भरपाई दिली जाणार आहे,असे सांगितले. तर भाजपचे नवनाथ बन यांनी मुंबईकरांची पाण्याची भविष्यातील गरज ओळखून जर आपण याला मंजुरी दिली नाही तर भावी पिढी आपल्याला माफ करणार नाही असे सांगितले. तर उबाठाच्या विशाखा राऊत यांनी मलजल प्रक्रिया केंद्रातून १२०० दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होणार असून त्यासाठी स्वतंत्र जलवाहिनी टाकली गेली आहे का असा सवाल केला.
तर भाजपचे प्रकाश दरेकर यांनी मुंबईतील पाण्याची तफावत भरुन काढण्यासाठी या गारगाई पाणी प्रकल्पाची गरज असून जर पाण्याचा प्रश्न आपण सोडवू शकलो नाही तर भविष्यात पाण्यावरुन युध्द होण्याची भीती वर्तवली. तर उबाठाचे सचिन पडवळ यांनी फणसे यांच्या मागणीला पाठिंबा देताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या व्यासपीठावरील फलकाचे फोटो झळकावत आम्ही विरोधाला विरोध करणार नाही असे सांगितले. तर विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी गारगाई प्रकल्प नकोच असे नाही, पण पर्यावरणाचा विचार व्हायला हवा. एप्रिलपासून या कामाला सुरुवात होणार असून तेथील कुटुंबाच्या पुनर्वसनाच्या मुद्दयावर आमचा विरोध आहे. त्यातुलनेत समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प पूर्ण करू शकतो असे सांगत गारगाई प्रकल्प दप्तरी दाखल करण्याची मागणी केली. याचा समाचार सभागृहनेते गणेश खणकर यांनी उबाठाच्या मागणीचा विरोध करत मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी सध्याचा पाणी साठा अपुरा असल्यामुळे गारगाई पाणी प्रकल्पाची गरज आहे. त्यामुळे पाण्याच्या मुद्दयावरुन राजकारण न करता गारगाई पाणी प्रकल्पाला गती देतानाच आवश्यकतेनुसार समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू.हा प्रकल्प कुणी आणला यापेक्षा मुंबईकरांना अधिक पाणी कसे मिळेल हे पाहणे आवश्यक आहे. त्यादृष्टीकोनातून यासाठीच्या पुढील परवानगी आणण्याचा प्रयत्न केला जाईल असे सांगण्याचा प्रयत्न केला.
यावर महापौर रितू तावडे यांनी उपसूचना मताला टाकून बहुमताच्या आधारे फेटाळून लावली आणि त्यानंतर मूळ प्रस्तावही बहुमताच्या आधारे मंजूर केला. यामध्ये उबाठासह काँग्रेस आणि इतर पक्षांच्या ८८ नगरसेवकांनी याला विरोध केला. तर भाजप आणि शिवसेनेच्या १०२ नगरसेवकांनी याला पाठिंबा दिल्यामुळे बहुमताच्या आधारे याला मंजुरी दिली. ही उपसूचना मंजुरीला टाकताना महापौरांनी अनुकूल प्रतिकूल म्हटल्यानंतर पोलची मागणी करण्याऐवजी आधीपासून ही मागणी केल्यामुळे महापौरांनी नियमांवर बोट दाखवून त्यांची पोलची मागणीही फेटाळून लावली.
महापौरांनी अशाप्रकारे केला विरोधकांचा गेम
पोलची मागणी मान्य केल्यामुळे उबाठा काँग्रेसचे सर्व नगरसेवक आक्रमक झाले. पण त्याचवेळी महापौरांनी विरोधी पक्षनेत्यांना निवेदन करण्यासाठी नाव पुकारले. त्यावर विरोधी पक्षनेत्या निवेदन मांडण्याच्या तयारीत होत्या, तर दुसरीकडे उबाठाचे नगरसेवक हे सभात्याग करावा अशी सूचना करत विरोधी पक्षांना निवेदन करू नये असे सांगत होते. त्यामुळे काहीशा त्रासिक होत विरोधी पक्षनेत्यांनी मान्सूनपूर्व कामांच्या तयारीचे निवेदन मांडण्यास सुरुवात केली आणि उबाठाच्या नगरसेवकांना सभात्याग करण्याऐवजी सभागृहात बसून त्यावर चर्चेत भाग घ्यावा लागला. त्यामुळे निवेदनाच्या मुद्दयावरून महापौरांनी उबाठाचे मनसुबेच उधळवून लावले.






