Wednesday, April 8, 2026

Bmc News : मुंबईत यापूर्वी खरेदी केलेल्या कचरा पेट्या गेल्या कुठे? महापालिका प्रशासनावर स्थायी समितीची प्रश्नांची सरबती

Bmc News : मुंबईत यापूर्वी खरेदी केलेल्या कचरा पेट्या गेल्या कुठे? महापालिका प्रशासनावर स्थायी समितीची प्रश्नांची सरबती

खासगी कंत्राटदार कचरा पेट्या देणार तर अधिक पेट्यांची खरेदी कशाला?

पेट्या खरेदीचा प्रस्ताव अध्यक्षांनी ठेवला राखून

मुंबई : मुंबईतील विविध भागांसाठी महापालिकेच्यावतीने तब्बल १३,५०० मोठ्या आकाराच्या कचरा पेट्या खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यापूर्वी खरेदी केलेल्या कचरा पेट्या कुठे गेल्या आणि कुणाकुणाला दिल्या गेल्या याचा हिशोब आधी द्या अशी मागणीच स्थायी समिती सदस्यांनी केली. एवढेच नाहीतर कचऱ्याच्या खासगीकरणाचा कंत्राट मंजूर करताना कंपनीच्यावतीने मनुष्यबळ, वाहने तसेच कचरा पेट्यांचेही वाटप होणार आहे, तर मग या कचरा पेट्या कशासाठी खरेदी केल्या जात आहे असा सवाल समितीने केल्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी सदस्यांच्या प्रश्नांची उत्तरे येईपर्यंत हा प्रस्ताव राखून ठेवला.

मुंबईतील मोठ्या आकाराच्या कचरा कुंड्या हटवून रस्त्यांवरील सार्वजनिक कचरा कुंडयांचे संख्या कमी केली जात असतानाच आता महापालिका प्रशासन तब्बल १३ हजार ५०० कचरा कुंड्यांची खरेदी करणार आहे.

मुंबई महापालिकेच्यावतीने सध्या २४० लिटर क्षमतेच्या कचरा पेट्यांची खरेदी करण्यात येत असून या कचरा पेट्यांसाठी मागवलेल्या निविदेमध्ये पात्र ठरलेल्या प्रायमा प्लास्टिक्स लिमिटेड कंपनीची निवड करण्यात येत आहे. त्यामुळे तब्बल २०३९ दराने २४० लिटर क्षमतेच्या या १३,५०० कचरा पेट्यांची खरेदी केली जाणार आहे.

याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत आला असता शिवसेनेचे गटनेते अमेय घोले यांनी याची खरेदी जेम पोर्टलवरुन का केली नाही असा सवाल करत कुठल्या विभागाला किती आणि नगरसेवकांना किती मिळणार याची कुठेच या प्रस्तावात माहिती देण्यात आली नसल्याने पूर्ण माहितीसह प्रस्ताव आणला जावा अशी मागणी केली. यात उत्पादक कंपन्यांनी भाग घेतला ही चांगली बाब आहे. मग मागील वर्षी जास्त दरात या कचरा पेट्यांची खरेदी करण्यात आली होती, तेव्हा कोणत्या कंपनीकडून घेतली जात आहे आणि आता कमी दराने खरेदी केली जात आहे, त्यामुळे या पेट्यांचा दर्जा कसा असेल असा सवाल शीतल गंभीर यांनी केला.

तर भाजपच्या प्रिती सातम यांनी आरे कॉलनीला कचऱ्याचे डम्पिंग ग्राऊंड केले जात असल्याचा आरोप करत याठिकाणी कचरा पेट्याही आहेत आणि गाड्याही येतात. परंतु उचलला जाणारा कचरा येथील जंगलात नेऊन टाकला जातो. त्यामुळे एकप्रकारे आरे कॉलनीला भविष्यात डम्पिंग ग्राऊंड बनवले जात असल्याचा आरोप केला. तसेच कचऱ्याच्या खासगी कंत्राट कामांमध्ये कचर पेट्यांचे वितरण जर संबंधित कंपनी करणार असेल तर या पेट्यांची खरेदी का आणि कुणासाठी केली जात आहे याची माहिती देण्याची मागणी त्यांनी केली. डॉ सईदा खान यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाची मानसिकता बदलण्याची गरज असल्याचे सांगितले. तर मागील चार वर्षांत वितरण झालेल्या कचरा पेट्यांची वार्डनिहाय माहिती देण्याची मागणी केली. तर काँग्रेसचे अश्रफ आझमी यांनी घरोघरी कचरा पेट्यांची देण्याची मागणी केली. तर यामिनी जाधव यांनी सुमारे ५० लाखांचे काम आधीच देण्यात आल्याची बाब निदर्शनास आणून दिली. त्यामुळे अखेर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी सर्व प्रश्नांची उत्तरे प्रशासनाकडून येईपर्यंत हा प्रस्ताव राखून ठेवण्याचा निर्णय जाहीर केला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >