Wednesday, April 8, 2026

Bmc News : गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्प कामामुळे गोरेगावकर त्रस्त; भाजप नगरसेविका प्रिती सातम यांनी मांडल्या जनतेच्या व्यथा

Bmc News : गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्प कामामुळे गोरेगावकर त्रस्त; भाजप नगरसेविका प्रिती सातम यांनी मांडल्या जनतेच्या व्यथा

प्रकल्प कामात रस्ते सुरक्षेसह पर्यावरण आणि आरोग्याचा मुद्दा बनतो जटील

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या पूर्व आणि पश्चिम उपनगराला जोडणाऱ्या गोरेगाव मुलंड लिंक रोडच्या कामांमध्ये गोरेगाव परिसरात कंत्राटदाराकडून नियमांचे उल्लंघन केले जात असून महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी या प्रकल्प कामामुळे नागरिकांना प्रचंड त्रास तसेच गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे प्रकल्पाचे काम करताना जनतेला कोणताही त्रास होवू नये याची काळजी घेण्यात यावी अशी सूचना करत भाजपच्या नगरसेविका प्रिती सातम यांनी अशाप्रकारे कंत्राटदारांना मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी स्थायी समितीच्या बैठकीत हरकतीच्या मुद्दयाद्वारे केली. त्यामुळे या कामांबाबत सदस्याने उपस्थित केलेला मुद्दा महत्वाचा असून त्यांच्या सर्व मुद्दयांची माहिती पुढील बैठकीत सादर करत त्यांचा हरकतीचा मुद्दा समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी राखून ठेवला.

स्थायी समितीच्या बैठकीत भाजप नगरसेविका प्रिती सातम यांनी हकरतीचा मुद्दा उपस्थित करत गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पांतर्गत गोरेगाव परिसरात सुरु असलेल्या कामांमध्ये कोणत्याही प्रकारची सुरक्षेची काळजी घेतली जात नसल्याने नागरिकांना प्रचंड त्रास होत असल्याची तक्रार केली. या प्रकल्पांतर्गत अनेक ठिकाणी खोदकाम करण्यात आले आहे, परंतु त्याभाेवती सुरक्षा कठडे नाहीत, खोदलेल्या खड्डयातील साचलेल्या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. तसेच या खोदकामामुळे माती सर्वत्र पसरुन धुळीचे साम्राज्य पसरले आहे. परंतु याठिकाणी कोणत्याही प्रकारे पर्यावरणाच्या नियमांचे पालन केले जात नाही. सेवा रस्त्याचे काम यामुळे असमांतर झाल्यामुळे अनेकदा याठिकाणी वाहतूक कोंडी तसेच अपघात होण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे याबाबत मागील एक ते दीड वर्षांपासून नागरिकांच्या तक्रारींनुसार अधिकाऱ्यांकडे गाऱ्हाणी मांडल्यानंतरही त्यांच्याकडून दखल घेतली जात नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड रोष वाढत आहे.

या प्रकल्प कामांत कंत्राटदार योग्यप्रकारे नियमांचे पालन करत नाही आणि महापालिकेचे अधिकारी नागरिकांच्या तक्रारींची दखल घेवून त्यांच्याकडून योग्यप्रकारे काम करून घेत नाही. परिणामी ही समस्या दिवसेंदिवस वाढत जात असून नागरिकांमधील वाढता रोष पाहता मला स्थायी समितीत हा मुद्दा मांडण्याची वेळ आली आहे. महापालिकेचा हा प्रकल्प पूर्ण व्हायला हवा, परंतु नागरिकांना सेवा देण्यासाठी हा प्रकल्प उभारताना जनतेला कोणताही त्रास होणार नाही याची काळजी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घ्यायला हवी आणि कंत्राटदाराकडून तसे काम करून घ्यायला हवे.पण याकडे दुर्लक्ष होत असून येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी याचे निवारण न केल्यास तेथील नागरिकांना जगणेही मुश्किल होईल.त्यामुळे या प्रकल्प कामांमध्ये ज्या आवश्यक सुधारणा करून जनतेला कमीत कमी त्रास होईल अशाप्रकारे उपाययोजना महापालिका प्रशासनाकडून केल्या जाव्यात.आणि भविष्यात अशाप्रकारच्या घटना पुन्हा घडू नये यासाठी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जावी अशाप्रकारची मागणी सातम यांनी आपल्या हरकतीच्या मुद्दयाद्वारे केली. याला शिवसेनेच्या अंजली नाईक यांनी पाठिंबा देत मानखुर्द भागात रस्ते कामांमध्ये कोणत्याही प्रकारची काळजी घेतल नसल्याची तक्रार केली.त्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी हा हरकतीचा मुद्दा राखून ठेवला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >