Wednesday, April 8, 2026

New structure of Shaktipeeth Highway : शक्तीपीठ महामार्गाच्या नव्या संरचनेत सिंधुदुर्गमधील १० गावांचा समावेश

New structure of Shaktipeeth Highway : शक्तीपीठ महामार्गाच्या नव्या संरचनेत सिंधुदुर्गमधील १० गावांचा समावेश

मुंबई : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला काही भागांतून होणारा शेतकऱ्यांचा तीव्र विरोध लक्षात घेता, राज्य सरकारने या प्रकल्पाच्या आराखड्यात मोठे बदल केले आहेत. नव्या नियोजनानुसार महामार्गाचे संरेखन बदलण्यात आले असून, यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी आणि दोडामार्ग या दोन सीमावर्ती तालुक्यांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे. या दोन्ही तालुक्यांतील प्रत्येकी पाच अशा एकूण १० गावांचा समावेश या महामार्गात करण्यात आला आहे.

धार्मिक पर्यटनाला चालना देणाऱ्या या महामार्गाचा मूळ आराखडा शेतकऱ्यांच्या जमिनी संपादनाच्या विरोधामुळे वादात सापडला होता. त्यानंतर प्रशासनाने तांत्रिक फेरबदल करून स्थानिकांचा विरोध कमी करण्यासाठी नवीन मार्ग निश्चित केला आहे. नव्या आराखड्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी आणि दोडामार्गमधील सीमावर्ती गावांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

नव्याने समाविष्ट झालेली नवीन गावे

सावंतवाडी तालुका : केगद (चौकुळ), डेगवे, बांदा, पडवे आणि माजगाव.

दोडामार्ग तालुका : कुंभवडे, भेकुर्ली, कोलझर, तळकट आणि झोळंबे.

२१ धार्मिक स्थळांना जोडणार

- शक्तीपीठ महामार्ग आता राज्यातील १३ जिल्ह्यांतून जाणार असून एकूण १४ तालुक्यांना जोडणार आहे. या मार्गाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे राज्यातील २१ महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना हा मार्ग जोडला जाईल. यामुळे नागपूर ते गोवा हे अंतर अवघ्या ८ तासांत कापणे शक्य होणार आहे.

- केवळ पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणच नव्हे, तर विदर्भ आणि मराठवाड्यातील मार्गांतही सरकारने बदल केले आहेत. आता हा महामार्ग वर्धा, यवतमाळ, बीड, लातूर आणि सातारा या जिल्ह्यांतून मार्गक्रमण करेल. याव्यतिरिक्त नांदेड, हिंगोली, परभणी, धाराशिव, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांच्या सीमेतून जाणाऱ्या मार्गाची रचनाही नव्याने करण्यात आली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >