Wednesday, April 8, 2026

नाशिक: महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; छेडछाड व विनयभंग प्रकरणी ६ आरोपी गजाआड, SIT कडून तपास सुरू

नाशिक: महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; छेडछाड व विनयभंग प्रकरणी ६ आरोपी गजाआड, SIT कडून तपास सुरू

नाशिक : नाशिक शहरात गेल्या काही दिवसांत महिलांचा विनयभंग, छेडछाड आणि धार्मिक भावना दुखावल्याच्या गंभीर घटना उघडकीस आल्या आहेत. या प्रकरणाची दखल घेत नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई केली असून आतापर्यंत ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा सखोल आणि गतीने तपास करण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना केली आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, शहरात महिलांच्या सुरक्षेला बाधा आणणाऱ्या आणि सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या काही घटना घडल्या होत्या. यामध्ये ८ पीडित महिलांनी दिलेल्या तक्रारींवरून ८ स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच, एका पुरुषाच्या तक्रारीवरूनही १ गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या तक्रारींमध्ये विनयभंग, छेडछाड आणि धार्मिक भावनांना ठेच पोहचवल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

SIT कडून चौकशीचा फेरा

">सहाय्यक पोलीस आयुक्त मिटके यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, "गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक (SIT) तैनात करण्यात आले आहे. हे पथक या सर्व गुन्ह्यांचा तांत्रिक आणि प्रत्यक्ष पुराव्यांच्या आधारे तपास करेल." अटक करण्यात आलेल्या ६ आरोपींची कसून चौकशी सुरू असून, यामागे आणखी कोणाचे हात आहेत का, याचा शोध पोलीस घेत आहेत. यावेळी पोलिसांनी खाजगी संस्था आणि आस्थापनांना (Private Establishments) महत्त्वाचे आवाहन केले आहे. आपल्या कार्यस्थळी काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेची सर्वस्वी जबाबदारी ही संबंधित आस्थापनांची असेल. महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे हे मालक आणि व्यवस्थापनाचे कर्तव्य असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

महिलांना आवाहन: घाबरू नका, तक्रार करा!

नाशिक पोलिसांनी महिलांना धीर देताना सांगितले आहे की, जर कोणासोबतही छेडछाड किंवा विनयभंगाचा प्रकार घडत असेल, तर त्यांनी न घाबरता पोलिसांशी संपर्क साधावा. "तक्रार करणाऱ्या महिलेचे नाव आणि ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल. गुन्हेगारांना अद्दल घडवण्यासाठी महिलांनी पुढे येणे गरजेचे आहे," असे आवाहन सहाय्यक पोलीस आयुक्तांनी केले आहे. शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल सज्ज असून, अशा प्रकारच्या विकृत कृत्यांकडे दुर्लक्ष केले जाणार नाही, असा सज्जड दमही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >