Wednesday, April 8, 2026

Manipur Violence : मणिपूरमध्ये आंदोलनं चिघळलं, बॉम्बहल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, इंटरनेट बंदीसह संचारबंदी लागू

Manipur Violence : मणिपूरमध्ये आंदोलनं चिघळलं, बॉम्बहल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, इंटरनेट बंदीसह संचारबंदी लागू

मणिपूर येथे पुन्हा एकदा आंदोलन झालं आहे. सोमवारी मध्यरात्री विष्णुपूर जिल्ह्यात एका घरावर झालेल्या बॉम्बहल्ल्यात एका ५ वर्षांचा मुलाचा आणि सहा महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाला असून त्यांची आई या हल्ल्यात जखमी झाली आहे. या घटनेनंतर स्थानिकांनी आक्रमक पवित्रा घेत ठिकठिकाणी निदर्शनं केली. तणाव वाढल्यामुळे ४ जिल्ह्यांत संचारबंदी आणि ५ जिल्ह्यांत इंटरनेट सेवा बंद करण्यात आली.

परिसरातील पेट्रोल पंपाजवळील २ ते ३ टँकर आणि ट्रकला आग लावण्यात आली. मोइरांग पोलिस ठाण्यासमोर टायर जाळण्यात आले. तात्पुरत्या स्वरूपात उभी केलेली पोलिस चौकी उद्ध्वस्त करण्यात आली. तसेच, संतप्त नागरिकांनी वाहतुकीला अडथळा निर्माण करण्यासाठी इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील पांगेई आणि खुराईमध्ये आणि इम्फाळ पश्चिममधील लंगथाबलमध्ये वाहनांची वाहतूक थांबवली. रस्त्यांमध्ये टायर जाळले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा दलांना तैनात करण्यात आलं आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्यानं दिली.

मुख्यमंत्री वाय. खेमचंद सिंह यांनी हल्ल्याचा निषेध केला. ‘हे क्रूर कृत्य आहे. यास जबाबदार असलेल्यांची ओळख पटवून त्यांच्याविरोधात कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल,’ असं ते म्हणाले. ‘हा मानवतेवरील हल्ला असून मणिपूरमध्ये कष्टानं मिळवलेली शांतता बिघडवण्याचा थेट प्रयत्न आहे. कोणत्याही परिस्थिती हे दहशतवादी कृत्य सहन केले जाणार नाही,’ असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. मुख्यमंत्र्यांनी या घटनेत मृत्यू झालेल्या २ मुलांच्या जखमी आईची खासगी रुग्णालयात भेट घेतली. मोइरांग ट्रोंग्लाओबी चुराचंदपूरच्या डोंगराळ भागाजवळ आहे. २०२३ आणि २०२४मध्ये मैतेई आणि कुकी-झो गटांमधील वांशिक संघर्षादरम्यान येथे सातत्याने गोळीबार झाला होता.

मंगळवारी ट्रोंगलाओबीच्या जवळच्या परिसरातून एक स्फोटक उपकरणही जप्त करण्यात आले, असे आणखी एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं. दरम्यान, ‘ सीआरपीएफ तळावर आंदोलकांनी प्रवेश करू नये. बॉम्बहल्ल्यात सामील असलेल्या आरोपींना पकडण्यासाठीच्या मोहिमेवर सुरक्षा दलांना लक्ष केंद्रीत करू द्यावे, अशी विनंती मी केली होती, परंतु आंदोलकांनी या आवाहनाकडे दुर्लक्ष केले आणि त्यांनी तळावर हल्ला करत नासधूस केली. परिणामी सुरक्षा दलांनी गोळीबार केला,’ असे गृहमंत्री कांथौजम म्हणाले.

या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) सोपवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, असं खेमचंद यांनी सांगितलं. राज्याचे गृहमंत्री आणि इतर आमदारांशी विस्तृत चर्चा केल्यावर हा निर्णय घेण्यात आला, असे ते म्हणाले. हल्लेखोरांची अद्याप ओळख पटलेली नाही. व्यापक प्रमाणात धरपकड सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.

या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्याच्या दृष्टीनं मणिपूरमधील इम्फाळ पश्चिम, इम्फाळ पूर्व, थौबल, काकचिंग, विष्णूपूर या पाच जिल्ह्यांत ब्रॉडबँड, व्हीसॅट, व्हीपीएनसह इंटरनेट सेवा बंद करण्याचे आदेश मणिपूर सरकारनं मंगळवारी प्रसृत केले.

बॉम्बस्फोटात २ मुलांचा मृत्यू झाल्यानंतर उसळलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मणिपूर सरकारनं मंगळवारी इम्फाळ पूर्व, इम्फाळ पश्चिम, विष्णूपूर आणि काकचिंग जिल्ह्यांमध्ये अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू केली आहे, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. '७ एप्रिलपासून पुढील आदेश येईपर्यंत कोणत्याही व्यक्तीच्या हालचालींवर निर्बंध घालण्यात येत आहे,' असं आदेशात म्हटलं आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा