Tuesday, April 7, 2026

RR vs MI : राजस्थानचा 'रॉयल' धमाका! मुंबई इंडियन्सचा धुव्वा उडवत पॉइंट्स टेबलमध्ये मोठी झेप!

RR vs MI : राजस्थानचा 'रॉयल' धमाका! मुंबई इंडियन्सचा धुव्वा उडवत पॉइंट्स टेबलमध्ये मोठी झेप!

गुवाहाटी : आयपीएलच्या १९ व्या मोसमात राजस्थान रॉयल्सने (Rajsthan Royals) आपला दबदबा कायम राखला आहे. मंगळवारी झालेल्या अटीतटीच्या लढतीत राजस्थानने बलाढ्य मुंबई इंडियन्सला २७ धावांनी धूळ चारली. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने मुंबईसमोर १५१ धावांचे माफक आव्हान ठेवले होते. मात्र, मुंबईची फलंदाजी या आव्हानासमोर पूर्णपणे कोलमडली. रियान परागच्या चाणाक्ष नेतृत्वाखाली राजस्थानच्या गोलंदाजांनी मुंबईला अवघ्या १२३ धावांत रोखले. मुंबईचे ९ फलंदाज स्वस्तात माघारी परतल्याने त्यांचा या स्पर्धेतील सलग दुसरा पराभव झाला आहे. राजस्थानने या विजयासह विजयाची हॅट्रिक साजरी केली असून, मुंबईला आता पुनरागमनासाठी कठोर मेहनत घ्यावी लागणार आहे.

राजस्थानचे मुंबईसमोर १५१ धावांचे लक्ष्य

गुवाहाटी येथील बारसपारा क्रिकेट स्टेडियमवर पावसाने बराच काळ खेळ रोखून धरला खरा, पण जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात झाली, तेव्हा राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांनी मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची अक्षरशः पळता भुई थोडी केली. पावसाच्या व्यत्ययामुळे तब्बल १६० मिनिटांचा वेळ वाया गेल्याने हा सामना प्रत्येकी ११ षटकांचा खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. रात्री १० वाजून १० मिनिटांनी सुरु झालेल्या या सामन्यात राजस्थानच्या फलंदाजांनी पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. सलामीवीर यशस्वी जैस्वालने मैदानाच्या चहूकडे फटकेबाजी करत मुंबईच्या गोलंदाजांना निष्प्रभ केले. त्याने नाबाद ७७ धावांची स्फोटक खेळी साकारली. त्याला तरुण फलंदाज वैभव सूर्यवंशीची उत्तम साथ मिळाली. वैभवने आक्रमक ३९ धावांचे योगदान देत राजस्थानला भक्कम स्थितीत नेऊन ठेवले. कर्णधार रियान परागने आपल्या घरच्या मैदानावर फटकेबाजीचा सराव सुरू ठेवत २० धावा जोडल्या. ध्रुव जुरेल अवघ्या २ धावांवर बाद झाल्याने काही काळ मुंबईला संधी मिळाली असे वाटले, पण जैस्वाल आणि शिमरॉन हेटमायरने (नाबाद ६) अधिक नुकसान होऊ न देता राजस्थानची धावसंख्या ११ षटकांत ३ बाद १५० पर्यंत पोहोचवली. मुंबई इंडियन्ससाठी अल्लाह गजनफरने २ गडी बाद करत थोडा प्रतिकार केला, तर अनुभवी शार्दूल ठाकूरने वैभव सूर्यवंशीची महत्त्वाची विकेट मिळवली. मात्र, पावसामुळे ओल्या झालेल्या चेंडूवर नियंत्रण मिळवणे मुंबईच्या गोलंदाजांना कठीण गेले. आता मुंबईसमोर विजयासाठी ११ षटकांत १३.७२ च्या सरासरीने १५१ धावांचे डोंगराएवढे आव्हान आहे.

मुंबईची फलंदाजी पत्त्यासारखी कोसळली

१५१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सच्या दिग्गज फलंदाजांनी सपशेल नांगी टाकली. सलामीवीर रोहित शर्मा (५), सूर्यकुमार यादव (६) आणि रायन रिकेल्टन (८) हे स्वस्तात माघारी परतले, तर कर्णधार हार्दिक पंड्यालाही केवळ ९ धावाच करता आल्या. मुंबईच्या टॉप ऑर्डरमधील एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही, ज्यामुळे मुंबईचा डाव सुरुवातीलाच गडगडला. मध्यफळीत नमन धीर आणि शेरफेन रुदरफोर्ड यांनी प्रत्येकी २५ धावांची खेळी करून थोडा प्रतिकार केला, मात्र इतर फलंदाजांची साथ न मिळाल्याने मुंबईला ११ षटकांत ९ विकेट्स गमावून केवळ १२३ धावांपर्यंतच मजल मारता आली. राजस्थानसाठी रवी बिश्नोई, नांद्रे बर्गर आणि संदीप शर्मा यांनी प्रत्येकी २ बळी घेत मुंबईचे कंबरडे मोडले, तर जोफ्रा आर्चर आणि तुषार देशपांडे यांनी प्रत्येकी १ विकेट घेत विजयावर शिक्कामोर्तब केले.

पंजाबला पछाडत राजस्थान रॉयल्स गुणतालिकेत अग्रस्थानी!

आयपीएल २०२६ च्या मैदानावर राजस्थान रॉयल्सचा अश्वमेध सुरूच असून, मुंबईविरुद्धच्या विजयाने त्यांना थेट गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचवले आहे. सलग तिसऱ्या विजयाची नोंद करत राजस्थानने पंजाब किंग्सला खालच्या क्रमांकावर ढकलून पहिले स्थान पटकावले. केवळ गुणच नव्हे, तर नेट रनरेटच्या बाबतीतही राजस्थानने मोठी आघाडी घेतली असून, सध्या त्यांचा रनरेट +2.403 इतका जबरदस्त झाला आहे. या कामगिरीमुळे राजस्थान रॉयल्स स्पर्धेतील सर्वात बलाढ्य संघ म्हणून समोर येत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >