अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबादमधील चांदखेडा परिसरातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका कुटुंबाने रात्रीच्या जेवणात आवडीने डोसा खाल्ला, मात्र हाच आनंद काही वेळातच मृत्यूचा सापळा ठरला. जेवण झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच कुटुंबातील दोन चिमुकल्या मुलींची प्राणज्योत मालवली. मिळालेल्या माहितीनुसार, अन्नातून झालेल्या तीव्र विषबाधेमुळे ही दुर्घटना घडली असल्याचे प्राथमिक रित्या समोर येत आहे. दोन्ही मुलींचा मृत्यू झाला असून, त्यांचे आई-वडील सध्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. एका हसत्याखेळत्या कुटुंबावर काळाने अचानक झडप घातल्याने संपूर्ण चांदखेडा परिसरात शोककळा पसरली असून, स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस आणि आरोग्य विभाग या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
नेमकं काय घडलं ?
चांदखेडा येथील प्रजापती कुटुंबावर ओढवलेल्या या भीषण दुर्घटनेमागील धक्कादायक कारण आता समोर आले आहे. १ एप्रिल रोजी विमल प्रजापती यांनी आयओसी रोडवरील एका स्थानिक डेअरीतून डोशाचे तयार पीठ (Batter) विकत आणले होते. त्या रात्री सर्वांनी मिळून आनंदाने डोसे खाल्ले, मात्र खरी आपत्ती दुसऱ्या दिवशी ओढवली. आदल्या दिवशी उरलेल्या त्याच पिठाचे दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा डोसे बनवून खाण्यात आले. हे शिळे किंवा दूषित झालेले पीठ खाल्ल्यानंतर काही वेळातच विमल प्रजापती, त्यांची पत्नी आणि दोन मुलींची प्रकृती वेगाने खालावली. विषबाधेची लक्षणे इतकी तीव्र होती की, दोन्ही चिमुकल्यांचा त्यात अंत झाला. एका साध्या वाटणाऱ्या खाद्यपदार्थाने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त केल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अन्नसुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश मुंबई (विशेष प्रतिनिधी) महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण ...
दोन निष्पाप कळ्या कोमेजल्या
पोलीस तपास सुरु
ज्या डेअरीतून डोशाचे पीठ विकत घेण्यात आले होते, तिथे पोलिसांनी तातडीने धाड टाकली आहे. पोलिसांनी संबंधित डेअरीतील पिठाचे नमुने अधिकृतपणे ताब्यात घेतले असून ते तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत (FSL) पाठवले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपासाला वेग दिला आहे. मृत दोन्ही मुलींच्या मृतदेहांचे शवविच्छेदन (Post-mortem) करण्यात आले असून त्याचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे. अन्नातून झालेली ही विषबाधा नेमकी कशामुळे झाली आणि पिठामध्ये काही घातक घटक होते का, याचा उलगडा प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच होणार आहे.
डेअरी मालकाने फेटाळले आरोप
ज्या डेअरीतून डोशाचे पीठ खरेदी करण्यात आले होते, त्या डेअरीचे मालक केतन भाई यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांच्या दाव्यामुळे या प्रकरणाचा गुंता आता अधिक वाढला असून पोलीस इतर शक्यतांचीही पडताळणी करत आहेत. केतन भाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी त्यांच्या डेअरीतून १०० किलोपेक्षा जास्त पिठाची विक्री झाली होती. "आम्ही इतर ग्राहकांशी संपर्क साधला, परंतु कोणाकडूनही अन्नातून विषबाधा झाल्याची एकही तक्रार आलेली नाही," असे त्यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे हा त्रास नेमका डेअरीतून आणलेल्या पिठामुळे झाला की डोसा बनवताना घरात वापरलेल्या पाणी, तेल किंवा इतर एखाद्या पदार्थामुळे झाला, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलीस आता डेअरीच्या नमुन्यांसोबतच घरातील इतर खाद्यपदार्थांचीही सखोल चौकशी करत आहेत.






