अकार्यक्षम नेत्यांना दाखवणार घरचा रस्ता; मंत्र्यांपासून शाखाप्रमुखांचे ‘रिपोर्ट कार्ड’ तयार होणार
मुंबई : आगामी राजकीय आव्हाने आणि पक्षांतर्गत मरगळ झटकण्यासाठी शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. "जे काम करतील तेच पदावर राहतील," असा इशारा देत त्यांनी शिवसेनेत ‘भाकरी’ फिरवण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी अकार्यक्षम नेत्यांना घरचा रस्ता दाखवून नव्या दमाच्या शिलेदारांना संधी देण्याची तयारी त्यांनी यानिमित्ताने सुरू केली आहे
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेच्या दोन मंत्र्यांच्या कामगिरीवर शिंदे प्रचंड नाराज आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये शिंदेंनी स्वतः झंझावाती प्रचार करूनही, काही मंत्री स्वतःच्या बालेकिल्ल्यात पक्षाला अपेक्षित यश मिळवून देऊ शकले नाहीत. नागपूर अधिवेशनावेळीच या मंत्र्यांची गच्छंती होणार होती, मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे हा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला होता. आता मात्र या मंत्र्यांना डच्चू मिळण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
पक्षात केवळ सत्तेचा लाभ घेण्यासाठी किंवा निधी मिळवण्यासाठी येणाऱ्यांना जागा नाही, असे संकेत उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. "आता आपल्याला क्वांटिटी (संख्या) नको, तर क्वालिटी (दर्जा) हवी आहे," अशा शब्दांत त्यांनी आपली भूमिका नेत्यांकडे स्पष्ट केली आहे. यापुढे मंत्र्यांपासून ते शाखाप्रमुखांपर्यंत प्रत्येकाच्या कामाचा अहवाल तयार होईल. जे प्रामाणिकपणे पक्षवाढीसाठी काम करतील, त्यांनाच भविष्यात मोठी पदे दिली जातील, तर कामचुकारांना पदावरून पायउतार व्हावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. मागील आठवड्यात पुण्याची संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त करून शिंदेंनी आधीच आपला इरादा स्पष्ट केला आहे.






