बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई तालुक्यातील कुंबफेळमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका २४ वर्षीय तरुणानं मित्रांसोबत झालेल्या वादानंतर आणि वाढदिवसाला न बोलवल्यामुळे आलेल्या नैराश्यातून विष प्राशन करून आपलं जीवन संपवलं आहे. महेश उद्धव भणगे असं या आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव असून, त्याने राहत्या घरी विष प्राशन करुन हे टोकाचं पाऊल उचललं.
आपल्या जवळच्या मित्राच्या वाढदिवसाला न बोलावल्यामुळे तो गेल्या काही दिवसांपासून प्रचंड नैराश्यात होता. त्यातूनच, त्यानं हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती असून याप्रकरणी, पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे.
नेमकं काय घडलं ?
या तरुणानं आपल्या घराच्या छतावर पाणी पिण्याच्या तांब्यात विषारी द्रव्य मिसळून प्राशन केले. दुपारी तो एकटाच छतावर झोपायला गेला होता, मात्र बराच वेळ झाला तरी तो खाली न आल्यानं रात्री ८ वाजताच्या सुमारास कुटुंबीय त्याला पाहण्यासाठी घराच्या छतावर गेले. त्यावेळी तो बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्याला तातडीनं अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं. पण, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
आत्महत्येपूर्वी महेशनं आपल्या मोबाईलवर "माझं दुःख कोणाला सांगू, मी एकटा पडलो" असं हृदयद्रावक स्टेटस ठेवलं होतं. गेल्या सोमवारी ६ एप्रिल २०२६ रोजी त्याच्या एका मित्राचा वाढदिवस होता. त्यावेळी महेशला मित्रांनी बोलावलं नाही आणि त्याला सोडूनच इतरांनी सेलिब्रेशन केलं.
या घटनेमुळे तो नैराश्येत गेला आणि त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं. या घटनेनं कुंबेफळ गावात हळहळ व्यक्त होत असून अंबाजोगाई ग्रामीण पोलिस या घटनेचा अधिकच तपास करत आहेत.






