Tuesday, April 7, 2026

Manipur on edge : मणिपूरमध्ये रॉकेट हल्ल्यात दोन चिमुरड्यांचा मृत्यू; संतप्त जमावाचा सुरक्षा दलांवर हल्ला, बिष्णुपूरमध्ये तणाव

Manipur on edge : मणिपूरमध्ये रॉकेट हल्ल्यात दोन चिमुरड्यांचा मृत्यू; संतप्त जमावाचा सुरक्षा दलांवर हल्ला, बिष्णुपूरमध्ये तणाव

इंफाळ : मणिपूरमधील वांशिक हिंसाचाराने पुन्हा एकदा भीषण रूप धारण केले आहे. बिष्णुपूर जिल्ह्यात मंगळवारी पहाटे झालेल्या एका रॉकेटसदृश हल्ल्यात झोपेत असलेल्या दोन निष्पाप बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असून, सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात अन्य दोन नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून सरकारने पाच जिल्ह्यांत इंटरनेट सेवा तीन दिवसांसाठी बंद केली आहे.

झोपेतच काळाचा घाला

बिष्णुपूर जिल्ह्यातील ट्रोंग्लाओबी अवांग लेकाई या गावात मंगळवारी पहाटे १ च्या सुमारास हा हल्ला झाला. डोंगराळ भागातून डागलेले एक रॉकेट थेट ओनाम मंगलसाणा यांच्या घरावर येऊन पडले. यावेळी घरात गाढ झोपेत असलेल्या त्यांच्या चार वर्षांच्या मुलाचा आणि अवघ्या काही दिवसांच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला. मुलांची आई ओनाम बिनिता या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे, बिनिता या गुवाहाटीमध्ये परिचारिका असून बाळंतपणासाठी सुगावे गावी आल्या होत्या, तर त्यांचे पती सीमा सुरक्षा दलात (BSF) बिहारमध्ये कार्यरत आहेत. या घटनेचा तपास आता राष्ट्रीय तपास संस्थेकडे (NIA) सोपवण्यात आला आहे.

जमावाचा उद्रेक आणि गोळीबार

दोन निष्पाप बालकांच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी पसरताच बिष्णुपूर आणि इंफाळमध्ये जनक्षोभ उसळला. संतप्त जमावाने रस्त्यावर टायर जाळून रस्ते अडवले. आंदोलकांनी पोलिसांच्या वाहनांना आणि तेलाच्या टँकरला आग लावली. परिस्थिती हाताबाहेर जात असताना जमावाला पांगवण्यासाठी सीआरपीएफने (CRPF) केलेल्या गोळीबारात दोन आंदोलकांचा मृत्यू झाला, ज्यामुळे तणाव अधिकच वाढला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >