Tuesday, April 7, 2026

IPL 2026: मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आज आमनेसामने; विजयासाठी दोन्ही संघ सज्ज

IPL 2026: मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आज आमनेसामने; विजयासाठी दोन्ही संघ सज्ज

मुंबई : आयपीएल 2026 मधील आजचा सामना क्रिकेटप्रेमींसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील ही लढत गुवाहाटीच्या एसीए स्टेडियमवर रंगणार असून, दोन्ही संघांसाठी स्पर्धेतील स्थान मजबूत करण्याची ही मोठी संधी मानली जात आहे.

सामन्याची वेळ आणि प्रसारण

हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार असून, स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर तसेच हॉटस्टारवर थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. गुवाहाटीतील एसीए स्टेडियमवर या सामन्याला चांगलीगर्दी होण्याची अपेक्षा आहे

दोन्ही संघांची सध्याची कामगिरी

मुंबई इंडियन्सने आतापर्यंत दोन सामन्यांपैकी एक विजय मिळवला असून, एक सामना गमावला आहे. त्यामुळे सातत्य राखण्याचे आव्हान मुंबईसमोर आहे. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सने दोन्ही सामने जिंकून स्पर्धेला दमदार सुरुवात केली आहे. त्यामुळे विजयाची हॅट्रिक करण्याच्या उद्देशाने राजस्थान मैदानात उतरू शकते.

एकूण आकडेवारी

मुंबई आणि राजस्थान यांच्यात आतापर्यंत 32 सामने झाले असून, त्यात मुंबईचे 17-15 असे थोडेसे वर्चस्व दिसते. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 11 पैकी 8 सामने जिंकले आहेत. तर प्रथम गोलंदाजी करताना राजस्थानने मुंबईवर 12-9 अशी आघाडी घेतली आहे. घरच्या मैदानावर राजस्थानने 13 पैकी 8 सामने जिंकले असल्याने त्यांचा आत्मविश्वास उंचावलेला आहे.

गुवाहाटी खेळपट्टी आणि हवामान

गुवाहाटीतील खेळपट्टीचा विचार करता, मागील काही सामन्यांमध्ये मोठे लक्ष्य राखण्यात संघांना अपयश आले आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजीचा पर्याय निवडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून, सुमारे 55 टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे सामन्यावर हवामानाचा परिणाम होऊ शकतो.

सामन्यातील महत्त्वाचे मुद्दे

राजस्थानचा आक्रमक खेळ मुंबईसाठी आव्हान ठरू शकतो. त्यामुळे त्यांच्या फलंदाजांना रोखण्यासाठी मुंबईला अचूक डावपेच आखावे लागतील. विशेषतः राजस्थानच्या सलामीवीरांची कामगिरी निर्णायक ठरू शकते. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या मागील सामन्यात अनुपस्थित होता. मात्र, त्याने सराव सुरू केल्याने या सामन्यात त्याच्या पुनरागमनाची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुंबईचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह अद्याप या स्पर्धेत विकेट मिळवू शकलेला नाही. त्यामुळे या सामन्यात तो प्रभावी कामगिरी करण्याच्या प्रयत्नात असेल. दुसरीकडे, यशस्वी जयस्वाल, वैभव सूर्यवंशी आणि ध्रुव जुरेल यांना रोखण्यासाठी मुंबईला ठोस रणनीती आखावी लागेल. तसेच तुषार देशपांडेविरुद्ध रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांची फलंदाजी कशी ठरते, याकडेही लक्ष असेल.

एकूणच, आजचा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असून, राजस्थान आपली विजयी मालिका कायम राखणार की मुंबई पुनरागमन करत दुसरा विजय मिळवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment