मुंबई: देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्षाविषयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आणि पक्षाच्या विचारधारेविषयी विश्वासाचे, सकारात्मक वातावरण आहे. या वातावरणाचा योग्य वापर करून घेण्यासाठी कालबद्ध रीतीने कार्यक्रम आखून २०२९ चा संपूर्ण यशाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी काम करावे, आणि देशभक्ती, राष्ट्रीयत्व आणि विकासाची गंगा सर्वांपर्यंत पोहोचवावी, त्यासाठी सक्रिय कार्यकर्त्यांने कामाला लावावे असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सोमवारी केले. पक्षाच्या ४६ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित सक्रिय कार्यकर्ता मेळाव्यात चव्हाण बोलत होते.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीचा आणि आगामी कार्यक्रमाचा व्यापक आढावा घेतला. पक्षाच्या कार्यपद्धतीचा सकारात्मक परिणाम समाजावर कसा होईल याचा सर्वांगीण विचार पक्ष नेहमीच करत असतो. कार्यकर्त्यानेही तसाच विचार करावा, असेही ते म्हणाले. सेवा आणि समर्पण भावनेतून पक्षाचा कार्यकर्ता काम करत राहिला, त्यामुळेच माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सेवेची संधी प्राप्त झाली. भाजपला अनेक निवडणुकांमध्ये मिळालेले यश प्रचंड आहे. महाराष्ट्रात राजकीयदृष्ट्या पोषक समीकरण तयार करून प्रत्येक बूथची जबाबदारी घेणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी पुढच्या स्थापना दिनाआधी भक्कम करू या, असे आवाहनही त्यांनी केले.
आपली क्षमता, कार्यकर्त्यांच्या ताकद काय आहे, याची आपल्याला कल्पना आहे, त्यामुळे २०२९ ला जे अपेक्षित आहे, ते ध्येय यामुळे सोपे होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वात महाराष्ट्र प्रगतीची वेगवान वाटचाल करत आहे. त्यांची भूमिका स्पष्ट आहे. कार्यकर्त्यांनी केवळ कागदावर किंवा कार्डावर पदाधिकारी म्हणून न राहता सतर्क राहून कार्यपद्धतीची शक्ती सक्रिय ठेवत आपली भूमिका ओळखून कामाला लागले पाहिजे, असे ते म्हणाले.
स्वातंत्र्यानंतरचे मोदी सरकार हे एकमेव सरकार असे आहे, जे जगाच्या पाठीवर कोठेही भारतावरील संकटात असेल त्याच्या मदतीसाठी ते धावून जाते. आता देशासमोर जेव्हा संकटे उभी राहतात, तेव्हा देश मदतीसाठी संयुक्त राष्ट्रसंघांकडे पाहात नाही, आता ‘घुसेगा और मारेगा’ ही मोदी सरकारची नीती आहे. कोविडकाळात जगात मोठी लसीकरण मोहीम भारताची होती. जगाच्या पाठीवरील ९२ देशांमध्ये भारतीय कोविड लस पाठवून संकटाशी सामूहिक संघर्ष करण्यासाठी मोदी सरकारने पुढाकार घेतला, व ‘वसुधैव कुटुम्बकम’ ही शिकवण सार्थ केली, असे प्रातिपादन मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी केले. आपण आता जगातील तिसरी सर्वात अर्थव्यवस्था होत आहोत. आपला पक्ष हा जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे, आणि विश्वगुरूचे स्थान मिळेल अशा पक्षाचे आपण कार्यकर्ते आहोत ही अभिमानास्पद बाब आहे. हा कार्यकर्ता पदासाठी नव्हे, तर समाजाच्या सेवेसाठी काम करतो, असे ते म्हणाले.
काही राजकीय पक्ष रशियाची विचारसरणी मानतात, काही राजकीय पक्ष केवळ विरोधाच्या राजकारणासाठी निर्माण झाले. महाराष्ट्रात वाटेकरी पक्ष निर्माण होऊन भावकीच्या वाटणीचे राजकारण करू लागले. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष हा वेगळा आणि राष्ट्रीय विचारसरणीतून राष्ट्रासानठी समर्पित असलेला पक्ष आहे, ही आपल्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता हा ‘राष्ट्राय स्वाहा’ या भावनेने काम करतो, प्रसंगी घरादारावर तुळशीपत्र ठेवून पक्षाच्या प्रतिकूल परिस्थितीत योद्धा म्हणून काम करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांचा हा पक्ष आहे, याचा आम्हाला अभिमान आहे, अशा शब्दांत राज्याचे मंत्री आशीष शेलार यांनी भावना व्यक्त केल्या. छत्रपती शिवराय हे आमचे आदर्श आहेत, आणि छत्रपतींचा विचार हा आमचा संस्कार, आचार आहे. भारतीय जनता पक्ष हा मुंबईच्या मातीत जन्म झालेला पक्ष हे, जगभरात हिंदुत्वाचा डंका वाजविणारा आमचा पक्ष आहे, असे ते म्हणाले.
प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये यांनी आपल्या भाषणात पक्षाच्या स्थापनाप्रसंगी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी व्यक्त केलेल्या स्वप्नाचा अभिमानास्पद उल्लेख केला. या नेत्यांनी पाहिलेले स्वप्न आज पूर्ण झाले आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. आगामी काळात पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता पक्षाचा विचार आणि संस्कार घेऊन पुढे जात राहील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पक्षाचे असंख्य सक्रिय कार्यकर्ते, नेते, मंत्री, आमदार, नगरसेवकांच्या उत्साही उपस्थितीत साजऱ्या झालेल्या या समारंभात प्रारंभी पक्षाच्या उभारणीसाठी समर्पित भावनेने काम करणारे माजी मंत्री जगन्नाथ पाटील, ज्येष्ठ नेते मधु चव्हाण, लद्धारामजी नागवाणी, दिलीप हजारे, अरुण मोरसावाला, शरद चव्हाण, श्रीपाद मुसळे, अविनाश दलाल आदी ज्येष्ठ कार्यकर्त्यांना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. समारंभाच्या प्रारंभी पक्षाच्या वाटचालीचा आढावा घेणाऱ्या चित्रफितीद्वारे जनसंघ ते भाजपा या वाटचालीतील राष्ट्रसमर्पित कार्याचा पट प्रदर्शित करण्यात आला.






