राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार अर्ज भरण्याची मुदत सोमवारी संपुष्टात आली आहे. या निवडणुकीत दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिलेंना भाजपकडून उमोदवारी देण्यात आली असून या निवडणुकीत त्यांच्याविरोधात शरद पवार गटाकडून जयंत पाटील यांचे भाचे प्राजक्त तनपुरे रिंगणात उतरणार असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. राजकारणाचा दीर्घ अनुभव असलेले प्राजक्त तनपुरे यांनी मविआ सरकारच्या काळात राज्यमंत्री म्हणूनही काम केलं होतं. त्यामुळे भाजपचं पाठबळ असतानाही अक्षय कर्डिले यांना राहुरीची पोटनिवडणूक जड जाण्याची शक्यता होती. त्यामुळे भाजपनं सोमवारी सकाळी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आपला डाव टाकला.
सोमवारी सकाळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे दोन अनुभवी नेते प्राजक्त तनपुरे यांच्या भेटीला पोहोचले. यानंतर या तिघांमध्ये बराच काळ बंद दाराआड चर्चा झाली. यानंतर प्राजक्त तनपुरे यांचा राहुरीची पोटनिवडणूक लढवण्याचा विचार १८० अंशांच्या कोनात बदलल्याचे दिसले.
रवींद्र चव्हाण आणि राधाकृष्ण विखे पाटीलांनी प्राजक्त तनपुरे यांची भेट घेऊन त्यांचं मन वळवलं असलं तरी यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खेळी कारणीभूत असल्याचं सांगितलं जातं. देवेंद्र फडणवीस सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी केरळ दौऱ्यावर आहेत. मात्र, आज सकाळी रवींद्र चव्हाण हे तनपुरे यांच्या भेटीला पोहोचले तेव्हा त्यांनी तिथून थेट देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला. या एका फोन कॉलनं प्राजक्त तनपुरे यांचं मन वळाल्याचं सांगितलं जातं आहे.
आगामी काळात प्राजक्त तनपुरे राहुरी मतदारसंघात सांगतील त्या विकासकामांसाठी आणि समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकार १०० टक्के मदत करेल, असं आश्वासन फडणवीस यांनी तनपुरेंना दिलं. देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या महाराष्ट्राचे संपूर्ण राजकारण चालवणाऱ्या मोठ्या नेत्यानं शब्द दिल्यानं प्राजक्त तनपुरे राहुरी पोटनिवडणुकीत जिंकण्याची चांगली शक्यता असतानाही माघार घ्यायला तयार झाल्याचं राजकीय जाणकारांकडून सांगितलं जात आहे.
दुपारी ३ वाजण्यापूर्वी शरद पवार गटाकडून गोविंद मोकाटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. प्राजक्त तनपुरे ऐनवेळी माघार घेऊ शकतात, याची कल्पना असल्यानं शरद पवार गटाच्या मुंबई कार्यालयातून राहुरीत प्राजक्त तनपुरे आणि गोविंद मोकाटे असे २ एबी फॉर्म पाठवण्यात आले होते. पण, दुपारी अडीचच्या सुमारास गोविंद मोकाटे हे शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संदीप वरपे यांच्यासोबत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पोहोचले. तेव्हाच प्राजक्त तनपुरे यांनी माघार घेतल्याचं स्पष्ट झालं.
प्राजक्त तनपुरे यांनी रवींद्र चव्हाण आणि राधाकृष्ण विखे पाटीलांच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तेव्हाच त्यांचा सूर बदलल्याचं दिसून आलं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील इतक्या मोठ्या लोकांनी मला विनंती केली असल्यामुळे मी आता विचार करत आहे. राहुरीतील विकासाचे प्रश्न मार्गी लावण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक आश्वासन दिलं आहे. याबाबत मला कार्यकर्त्यांशी चर्चा करावी लागेल. माझा उमेदवारी अर्ज भरुन तयार आहे. ज्या मुद्द्यावर आपण निवडणूक लढवायचं म्हणतोय, तो मुद्दाच सोडवण्याची तयारी त्यांनी दाखवली असेल तर मला माझ्या सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा लागेल, असं प्राजक्त तनपुरे म्हणाले होते.






