Sunday, April 5, 2026

Pakistan Threatens To Target Kolkata : पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी दिली भारताला धमकी; कोलकाता शहर पाकिस्तानच्या टार्गेटवर?

Pakistan Threatens To Target Kolkata : पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी दिली भारताला धमकी; कोलकाता शहर पाकिस्तानच्या टार्गेटवर?

- शाहीन ३ मिसाइलच्या जोरावर पाकिस्तानचा भारताला धमकी देण्याचा नाहक प्रयत्न

मुंबई : पाकिस्तानकडून कोलकात्यावर हल्ल्याची दिलेली धमकी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी सियालकोट येथे पत्रकारांशी संवाद साधताना हे विधान केल्याने तणाव वाढला आहे. विशेष म्हणजे सियालकोट ते कोलकाता हे हवाई अंतर सुमारे १६०० ते १७०० किमी असून रस्त्याने ते २ हजार किमीपेक्षा अधिक आहे. तरीही पाकिस्तानकडे इतक्या लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे असल्याचा दावा करण्यात आला आहे.

‘शाहीन-३’ हे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र :

या दाव्याचा आधार म्हणजे ‘शाहीन-३’ हे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र. सुमारे २,७५० किमी रेंज असलेले हे पाकिस्तानचे सर्वात लांब पल्ल्याचे शस्त्र मानले जाते. २०१५ मध्ये याची पहिली चाचणी घेण्यात आली होती आणि आता ते पूर्णपणे कार्यान्वित असल्याचे सांगितले जाते. सॉलिड फ्यूलवर चालणारे हे क्षेपणास्त्र ट्रान्सपोर्टर इरेक्टर लाँचरद्वारे प्रक्षेपित केले जाऊ शकते. पारंपरिक तसेच आण्विक वॉरहेड वाहून नेण्याची क्षमता त्यात आहे.

शाहीन-३ व्यतिरिक्त पाकिस्तानकडे शाहीन-२ (१८०० किमी), शाहीन-१ (७५० किमी), गौरी (१५०० किमी) आणि बाबुर क्रूझ मिसाइल यांसारखी इतर क्षेपणास्त्रेही आहेत. ‘अबाबिल’ हे MIRV तंत्रज्ञान असलेले क्षेपणास्त्र एकाच वेळी अनेक लक्ष्यांवर मारा करू शकते. या सर्व क्षेपणास्त्रांमुळे भारतातील अनेक मोठी शहरे त्यांच्या टप्प्यात येतात, असा पाकिस्तानचा दावा आहे.

‘शाहीन-३’ ला ‘अग्नी-५’ चोख उत्तर देणार :

मात्र तज्ज्ञांच्या मते, पाकिस्तानकडून अशा प्रकारच्या धमक्या प्रामुख्याने सामरिक प्रतिबंधासाठी दिल्या जातात. भारताकडेही अत्याधुनिक आणि अधिक लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे उपलब्ध आहेत. ‘अग्नी-५’सारख्या मिसाइलची रेंज सुमारे ७००० किमी आहे. याशिवाय भारताची मल्टी-लेयर्ड एअर डिफेन्स सिस्टम शत्रूच्या क्षेपणास्त्रांना हवेतच नष्ट करण्यास सक्षम आहे.

त्यामुळे पाकिस्तानच्या धमकीकडे गांभीर्याने पाहिले जात असले तरी भारताची संरक्षण क्षमता लक्षात घेता कोणतीही संभाव्य परिस्थिती हाताळण्याची तयारी मजबूत असल्याचे स्पष्ट होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा