ब्रिटनने बोलावलेल्या 60 देशांच्या बैठकीत मांडले मत
नवी दिल्ली : पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणच्या नियंत्रणात गेलेली होर्मुजची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याची भारताने मागणी केली आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी ब्रिटनच्या पुढाकाराने आयोजित बहुपक्षीय बैठकीत ही भूमिका मांडली. या संघर्षात जलमार्गावर आपले नागरिक गमावणारा भारत हा एकमेव देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ब्रिटनने आयोजित केलेल्या या आभासी बैठकीत 60 हून अधिक देश सहभागी झाले होते. बैठकीचा मुख्य उद्देश होर्मुज सामुद्रधुनीत सुरक्षित आणि निर्बाध जहाजवाहतूक सुनिश्चित करणे हा होता. या संकटामुळे जागतिक तेलाच्या किमतीत मोठी वाढ होत आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनानुसार, मिस्री यांनी आंतरराष्ट्रीय जलमार्गांमध्ये मुक्त नौवहनाच्या तत्त्वावर भर दिला. तसेच या संघर्षाचा भारताच्या ऊर्जा सुरक्षेवर होत असलेला परिणामही त्यांनी अधोरेखित केला.बैठकीत त्यांनी सांगितले की, होर्मुज परिसरातील व्यापारी जहाजांवरील हल्ल्यांमध्ये भारतानेच सर्वाधिक नुकसान सोसले आहे. डायरेक्टोरेट जनरल ऑफ शिपिंगच्या माहितीनुसार, विदेशी ध्वज असलेल्या जहाजांवर कार्यरत किमान तीन भारतीय खलाशांचा मृत्यू झाला असून एक जखमी आहे. काही जहाजे अद्यापही या सामुद्रधुनीत अडकलेली आहेत.
मिस्री यांनी इशारा दिला की, या प्रदेशातील अस्थिरतेचा थेट परिणाम भारताच्या ऊर्जा सुरक्षेवर होत आहे. भारत हा जगातील प्रमुख कच्चे तेल आयात करणाऱ्या देशांपैकी एक असल्याने पश्चिम आशियातील परिस्थितीचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा प्रभाव पडत आहे. या संकटावर तोडगा काढण्यासाठी तणाव कमी करणे आणि सर्व पक्षांमध्ये संवाद व कूटनीती हाच एकमेव मार्ग असल्याचे त्यांनी नमूद केले. भारताने पुन्हा एकदा स्पष्ट केले की व्यापारी जहाजांवरील हल्ले अस्वीकार्य आहेत आणि आंतरराष्ट्रीय जलमार्गांमध्ये मुक्त वाहतूक सुनिश्चित केलीच पाहिजे.
आखाती देशांमध्ये सुमारे एक कोटी भारतीय नागरिक वास्तव्यास आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सर्व भारतीय नागरिक सुरक्षित असून भारतीय दूतावास त्यांच्या सतत संपर्कात आहेत. आतापर्यंत या संघर्षात 8 भारतीयांचा मृत्यू झाला असून एक जण बेपत्ता आहे.






