मुंबई : हनुमान जयंतीनिमित्त आज म्हणजेच गुरुवार २ एप्रिल २०२६ रोजी नितेश तिवारी दिग्दर्शित, नमित मल्होत्रा यांचं 'रामायण'मधील दोन भागांतील भव्य चित्रपटमालिका असलेल्या, रामाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर 'श्री रामा'ची भूमिका साकारत असून प्राइम फोकस स्टुडिओज निर्मित, आठ वेळा अकादमी पुरस्कार विजेता व्हिज्युअल इफेक्ट्स स्टुडिओ डीएनईजी आणि यश यांच्या मॉन्स्टर माइंड क्रिएशन्सच्या सहकार्यानं हा चित्रपट साकारला आहे.
२ एप्रिल २०२६ रोजी हनुमान जयंती निमित्त रामायणचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. या टीझरद्वारे प्रेक्षकांना रणबीर कपूरचा 'राम' म्हणून पहिला लूक पाहायला मिळाला असून हजारो वर्षांपासून जपली गेलेली ही कथा नव्या रूपात मांडण्यात आली आहे. ही कथा ऐकून जे मोठे झालेत त्यांच्यासाठी ही कथा नव्यानं अनुभवण्याची संधी आहे. तर इतरांसाठी ही पहिल्यांदाच अशा भव्यतेनं रामायण कथा अनुभवण्याची संधी आहे.
प्राइम फोकस स्टुडिओज हे जागतिक स्तरावर नाविन्यपूर्ण चित्रपट आणि विविध प्रकारचे कंटेंट निर्माण करणारे स्टुडिओ आहे. मॉन्स्टर माइंड क्रिएशन्स ही यश यांनी स्थापन केलेली निर्मिती संस्था आहे, जी नवे आणि प्रभावी कंटेंट निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करते.
'राम' हा असा नायक आहे जो, आजच्या काळात क्वचितच पाहायला मिळतो. जो इच्छेपेक्षा कर्तव्याची निवड करतो. योग्य असल्यास सत्तेपासून दूर जातो. आवश्यक ते करतो, जरी त्यासाठी सर्व काही गमवावं लागलं तरी. ‘मर्यादा पुरुषोत्तम’ म्हणून पूजला जाणारा राम आदर्श मानवी आचरणाचे एक प्रतीक आहे. सन्मान, करुणा आणि नैतिक स्पष्टतेचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राम आहे.
रामायणाबद्दल बोलताना दिग्दर्शक नितेश तिवारी म्हणतात, "रामायण ची महानता तिच्या भावनिक गाभ्यात आहे. ही फक्त चांगले-वाईट यांच्यातील लढाई नाही, तर निर्णय, परिणाम आणि योग्य गोष्ट करण्याच्या ओझ्याची कथा आहे. रामाचा प्रवास अत्यंत मानवी आहे आणि आम्ही त्याच्याशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न केला आहे.”
रणबीर कपूर रामाच्या भूमिकेबद्दल म्हणतात, “मी रामाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी नाही, तर त्याच्याकडून शिकण्यासाठी येथे आहे. त्याच्यातील साधेपणा आणि शुद्धता अत्यंत दुर्मिळ आहे, आणि ते समजून घेण्याचा प्रवास माझ्यासाठी नम्र करणारा अनुभव आहे.”
निर्माते नमित मल्होत्रा म्हणतात, “रामाच्या कथेची ताकद त्याने काय जिंकले यात नाही, तर त्याने काय त्यागले यात आहे. तो कर्तव्य, सत्य आणि त्यागाची निवड करतो, म्हणूनच ही कथा हजारो वर्षे टिकून आहे.”
नमित मल्होत्रा यांच्या रामायणाचं परिचय
रामायण: भाग १ हा जगातील सर्वात प्रसिद्ध महाकाव्यावर आधारित दोन भागांचा भव्य चित्रपट आहे. सृष्टीच्या सुरुवातीपासून त्रिमूर्ती -ब्रह्मा (निर्माता), विष्णू (संरक्षक) आणि शिव (संहारक) - तीन लोकांवर राज्य करतात. जेव्हा विश्व अस्थिरतेकडे झुकते, तेव्हा विष्णू पृथ्वीवर अवतार घेतात, यावेळी राम (रणबीर कपूर). त्याच्या विरोधात उभा आहे रावण (यश) - अत्यंत शक्तिशाली आणि अभिमानी राक्षस राजा. राम, अयोध्येचा प्रिय युवराज, आपल्या पत्नी सीता (साई पल्लवी) आणि भाऊ लक्ष्मण (रवी दुबे) यांच्यासह शांत जीवन जगण्याचा प्रयत्न करतो, पण, नियती त्याला वनवासात ढकलते आणि रावणाशी भव्य युद्धाकडे घेऊन जाते.
या चित्रपटात भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांनी महत्वाच्या भूमिकेत झळकणार असून अभिनेत्री साई पल्लवी सीतेची भूमिका साकारणार असून अभिनेता सनी देओल हनुमानच्या भूमिकेत तर अभिनेता रवी दुबे लक्ष्मणाची भूमिका साकारणार आहे. या सिनेमात हान्स झिमर आणि ए. आर. रहमान यांचं संगीत असणार आहे.
रामायण भाग १ जागतिक स्तरावर दिवाळी २०२६ मध्ये प्रदर्शित होणार आहे. तर भाग २ दिवाळी २०२७ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रामायण ही केवळ कथा नसून एक जिवंत सांस्कृतिक शक्ती आहे. रामाच्या अयोध्येला परतण्याचा क्षण दिवाळी म्हणून साजरा केला जातो. प्रकाशाचा अंधारावर आणि चांगुलपणाचा वाईटावर विजय दर्शवणारा.
रामायणच्या जगभरात ३०० पेक्षा अधिक आवृत्त्या असून अयोध्या हे जगातील सर्वाधिक भेट दिले जाणारे आध्यात्मिक स्थळ बनले आहे. २०२४ मध्ये राम मंदिराचं उद्घाटन सांस्कृतिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं ठरलं.






