Thursday, April 2, 2026

Mumbai : आनंदाची बातमी, पावसाळ्याआधी हे उड्डाणपूल सुरू होणार, मुंबईकरांचा प्रवास वेगवान होणार

Mumbai : आनंदाची बातमी, पावसाळ्याआधी हे उड्डाणपूल सुरू होणार, मुंबईकरांचा प्रवास वेगवान होणार

मुंबई : राज्याच्या राजधानीतील वाहतूक कोंडीची तीव्रता कमी होण्यास मदत होणार आहे. मुंबईतील सात उड्डाणपुलांचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. यंदाच्या पावसाळ्याआधी विद्याविहार, सायन आणि गोरेगाव येथील उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुले होतील. यामुळे वाहतुकीचा वेग वाढण्यास मदत होणार आहे. प्रवाशांच्या वेळेची आणि इंधनाची बचत होणार आहे. इंधन वाचणार असल्यामुळे इंधनावरील खर्चातही बचत होणार आहे.

मुंबईच्या पूर्व उपनगरांपैकी एक असलेल्या विद्याविहारच्या पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारा उड्डाणपूल वाहतुकीसाठी महत्त्वाचा आहे. हा पूल लाल बहादूर शास्त्री मार्ग अर्थात एलबीएस मार्ग आणि चेंबूर मार्ग यांना जोडतो. या उड्डाणपुलामुळे रेल्वे स्थानकावर पोहोचणे प्रवाशांसाठी अधिक सोपे होणार आहे. हा पूल २५ जून २०२६ किंवा त्याआधी पूर्ण होण्याची शक्यता आहे.

विद्याविहार प्रमाणेच सायनचा उड्डाणपूल हा महत्त्वाचा आहे. सायनचा उड्डाणपूल मुंबई शहर आणि मुंबई उपनगर यांना जोडणार असल्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे. हा पूल १५ जुलै २०२६ किंवा त्याआधी पूर्ण होण्याची शक्यता आहे.

महालक्ष्मी रेल्वे स्टेशनजवळ तयार होत असलेला महालक्ष्मी केबल स्टेड पूल हा रेल्वे मार्गावरील अशा प्रकारचा पहिलाच पूल आहे. हा पूल २०२६ च्या दिवाळी पर्यंत मुंबईकरांना उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

मुंबईच्या पश्चिम उपनगरांत गोरेगाव ते दिंडोशी दरम्यानच्या उड्डाणपुलाचे काम अतिशय वेगाने सुरू आहे. हा पूल ३१ मे २०२६ किंवा त्याआधी पूर्ण होण्याची शक्यता आहे.

मुंबईच्या वरळी परिसरातील वाहतुकीच्या सुयोग्य व्यवस्थापनासाठी नेहरू तारांगण येथे नवीन उड्डाणपूल बांधण्याबाबत विचार सुरू आहे. सध्या या प्रस्तावाचा तांत्रिक अभ्यास सुरू आहे. लवकरच या पुलाबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे.

उड्डाणपुलांमुळे मुंबईतल्या वाहतुकीचा वेग वाढण्यास, इंधनाची पर्यायाने पैशांची बचत होण्यास तसेच वेळ वाचवण्यास मदत होणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >