Wednesday, April 1, 2026

SIT : विरोधकांनी 'तोंडाच्या वाफा' टाकू नयेत, पुरावे असतील तर एसआयटीकडे द्या !!

SIT : विरोधकांनी 'तोंडाच्या वाफा' टाकू नयेत, पुरावे असतील तर एसआयटीकडे द्या !!
मुंबई : विरोधक केवळ जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करत आहेत. त्यांनी केवळ 'तोंडाच्या वाफा' टाकू नयेत, पुरावे असतील तर एसआयटीकडे द्यावेत असे खडे बोल सुनावत खरात प्रकरण आणि राज्यातील विविध संवेदनशील मुद्द्यांवरून राजकारण करणाऱ्या विरोधी नेत्यांचा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज कडक शब्दांत समाचार घेतला. खरात प्रकरणाच्या चौकशीबाबत बोलताना मंत्री बावनकुळे म्हणाले की, "अतिशय संवेदनशील प्रकरणाची एसआयटी चौकशी सुरू आहे. रोहित पवार आणि विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांमध्ये विधाने करण्यापेक्षा त्यांच्याकडे असलेले पुरावे एसआयटीला द्यावेत. केवळ प्रसिद्धीसाठी आणि स्वतःची किंमत वाढवण्यासाठी जनतेमध्ये कल्लोळ निर्माण करण्याचे काम त्यांनी करू नये." खरात यांची पत्नी फरार असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, महाराष्ट्र पोलीस सक्षम असून त्यांना शोधून काढतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. • सरकार पाडण्याचे 'दिवास्वप्न' पाहू नका : एकनाथ खडसे यांनी सरकार पडण्याबाबत केलेल्या विधानावर टीका करताना मंत्री बावनकुळे म्हणाले की, "महायुती सरकार हे ५१ टक्के मते मिळवून सत्तेवर आले आहे. हे काही अल्पमतातले सरकार नाही. त्यामुळे खडसे साहेबांनी सरकार पडण्याच्या भ्रमात राहू नये. कायद्याच्या राज्यात गुन्हेगार कितीही मोठा असला तरी त्याला शिक्षा होईलच, पण अशा घटनांमुळे सरकार पडत नसते." •राहुल गांधी,ममता बॅनर्जी आणि संजय राऊतांवर निशाणा : वंदे मातरम गाताना खुर्चीत बसून राहिल्याच्या कथित व्हिडिओवरून बावनकुळे यांनी राहुल गांधींवर टीका केली. "त्यांच्यावर राष्ट्रगीताचे आणि वंदे मातरमचे संस्कारच नाहीत," असे ते म्हणाले. "संजय राऊत आजकाल काय बोलतात हे कोणीही गांभीर्याने ऐकत नाही, त्यामुळे त्यांच्या विधानांना मी महत्त्व देत नाही," अशा शब्दांत त्यांनी राऊतांना टोला लगावला. पश्चिम बंगालमधील परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी म्हटले की, पराभवाच्या छायेत असलेल्या ममता बॅनर्जी आता सहानुभूती मिळवण्यासाठी ईव्हीएमवर खापर फोडण्याची तयारी करत आहेत.
Comments
Add Comment