जळगाव : केळी उत्पादनासाठी ओळखल्या जाणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यासह परिसरात यंदाच्या हंगामाची सुरुवात शेतकऱ्यांसाठी चिंताजनक ठरली आहे. नवती हंगाम सुरू होण्यापूर्वीच केळीच्या दरात मोठी घसरण झाली असून, सध्या बाजारभावात ५०० ते १००० रुपयांची घसरण झाली आहे.
गेल्या वर्षी याच कालावधीत केळीला २००० रुपयांहून अधिक दर मिळत होता. मात्र यंदा दर निम्म्याहून कमी झाल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. उत्पादन खर्च वाढत असताना बाजारभाव घसरल्याने केळी उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.दरम्यान, केळीच्या दरात झालेल्या मोठ्या घसरणीमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज आंदोलनाचा मार्ग अवलंबला. यावल तालुक्यातील न्हावी तसेच आसपासच्या गावांतील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन करत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.






