मुंबई : टेलिव्हिजन विश्वात सध्या रिअॅलिटी शो मोठ्या प्रामणात गाजताना पाहायला मिळतात. हे शो अनेक गोंष्टींमुळे चर्चेतही असतात. या रिअॅलिटी शोमधील भाडणं, वादविवाद, याबरोबरच अनेकांच्या जोड्याही जुळतात. मात्र, शो संपल्यानंतर यांपैकी काही जोड्या कायम एकत्र राहतात तर काही जोड्या तुटतात. अशीच एक सतत चर्चेत असणारी जोडी म्हणजे अरबाज पटेल (Arbaz patel) आणि निक्की तांबोळी (nikki tamboli) ही आहे.
निक्की आणि अरबाज ही जोडी बिग बॉस मराठीच्या मागील पर्वात सहभागी झालेली. त्यावेळी बिग बॉसच्या घरात दोघांची मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. शोनंतर दोघांनी आपल्या नात्याची कबुली दिली. तर हे कपल सोशल मीडियावरही एकमोकांबद्दल प्रेम व्यक्त करत असतात. ही जोडी नुकताच पुन्हा एकदा 'द 50' या रिअॅलिटी शोमध्येदेखील सहभागी झालेली या शोमध्ये दोघांची केमिस्ट्री सर्वांना प्रचंड आवडली.
बिग बॉसच्या घरातून सुरू झालेलं यांचं नातं अजूनही टिकून आहे, त्यांच्या जोडीवर चाहतेही सतत प्रेमाचा वर्षाव करत असतात. अशातच आता दोघांना अनेकवेळा लग्न करणार का? असा प्रश्न विचारला जातो.
नुकताच द 50 रिअॅलिटी शोचा फिनाले पार पडला असून या शोचा विजेता शिव ठाकरे ठरला आहे. या शोनंतर एका मुलाखतीत बोलत असताना अरबाजने शोमधील वाद, राडा यासोबतच त्याच्या आणि निक्कीच्या नात्याबद्दलही गप्पा मारल्या. यादरम्यान दोघेही लग्न कधी करणार? या प्रश्नाचंही उत्तर अरबाजनं दिलं आहे.
दोघांच्या लग्नाबद्दल बोलताना अरबाज म्हणाला की आमच्याबद्दल तुम्ही एवढा चांगला विचार करताय, हे ऐकून खूप आनंद होतोय, लवकरच एक चांगला मुहूर्त काढू, जो चांगला मुहूर्त असेल, त्या मुहूर्तावर लग्न करू, पण सध्या ही काम करण्याची आणि यश मिळवण्याची वेळ आहे. हे वय आणि ही वेळ पैसे कमावण्याचं आणि जीवनात पुढे जाण्याचं आहे. तर जेवढ्या चांगल्या गोष्टी होतील, तेवढ्या लवकर आम्ही लग्न करू असं अरबाज दोघांच्या लग्नाबाबत म्हणाला आहे.