Wednesday, April 1, 2026

50 Kg Sack : बाजार समितीमध्ये शेतमालाच्या गोण्यांची चढ -उतारा साठी ५० किलोची मर्यादा

50 Kg Sack : बाजार समितीमध्ये शेतमालाच्या गोण्यांची चढ -उतारा साठी ५० किलोची मर्यादा

मुंबई : जागतिक कामगार परिषदेच्या मार्गदर्शक सूचना व राज्यातील माथाडी कामगाराची मागणी लक्षात घेता सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाच्या गोण्या - पिशव्यांची चढ - उतारा साठी ५० किलो वजना पर्यंत मर्यादा करण्यात आली आहे. या निर्देशाची राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आदेश पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले. या अनुषंगाने पणन विभागाने तातडीने शासन निर्णय प्रसिद्ध करण्याची सूचना ही त्यांनी केली.

कामगारांना ५० किलो पेक्षा जास्त वजन उचलावे लागू नये यासाठी कांदे - बटाट्याच्या ५० किलो पेक्षा अधिक वजनाच्या गोण्या भरण्यात येऊ नयेत, त्यासंदर्भातील माथाडी कामगारांची वेळोवेळी मागणी होती.या मागणीच्या अनुषंगाने मंत्रालयात बुधवारी बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस वन मंत्री गणेश नाईक, आमदार शरद सोनवणे, माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील, पणन विभागाचे सहसचिव विजय लहाने, सहसंचालक स्नेहा जोशी, कामगार विभागाचे उपसचिव श्री.कापडणीस, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव शरद जरे, व्यापारी आणि माथाडी कामगारांचे प्रतिनिधी, पणन आणि कामगार विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पणन मंत्री जयकुमार रावल म्हणाले, जागतिक कामगार परिषदेच्या मार्गदर्शक सूचना व राज्यातील माथाडी कामगाराची मागणी लक्षात घेता कामगारांचे शरीर स्वास्थ्य विचारात घेऊन आंतरराष्ट्रीय मजूर परिषदेने केलेल्या ५० किलो वजनाच्या शिफारसीनुसार पणन विभागाने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची राज्यातील सर्व ३०५ बाजार समित्यांमध्ये अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. यासंदर्भात सर्व बाजार समित्यांनी व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये जागृती करुन अंमलबजावणी करावी.तसेच ५० किलो शेतमाल पॅकिंग मर्यादेचा नियम केंद्र सरकारने करावा यासाठी केंद्र सरकार बरोबर पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. इतर राज्यांमधून येणाऱ्या शेतमालाची गोणी ५० किलोपेक्षा अधिक वजनाची नसावी यासाठी देशपातळीवर निर्णय व्हावा, या मागणीवर बोलताना वनमंत्री गणेश नाईक म्हणाले, यासंदर्भात केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना पणन विभागामार्फत प्रस्ताव पाठविण्यात यावा. त्या प्रस्तावाबाबत पाठपुरावा करण्यात येईल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा