मुंबई : मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. शहरात वीज पुरवठा करणाऱ्या बेस्ट, टाटा पावर आणि अदानी इलेक्ट्रिसिटी या तिन्ही कंपन्यांच्या वीज दरात कपात करण्यात आली असून हे नवे दर १ एप्रिल २०२६ पासून लागू होणार आहेत. नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच घेतलेल्या या निर्णयामुळे घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. विशेष म्हणजे मे महिन्यात येणाऱ्या वीज बिलामध्ये या कपातीचा थेट परिणाम दिसून येणार असल्याने मुंबईकरांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.
महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या मार्च २०२५ मधील आदेशानुसार हे नवे दर लागू करण्यात येत आहेत. बेस्टच्या वीज दरात पाहता०–१०० युनिट: ३.८४ रुपये (जुने दर ३.८४ रुपये) युनिटपर्यंतचा दर पूर्वीप्रमाणेच कायम ठेवण्यात आला असला तरी १०१–३०० युनिट: ७.१७ रुपये (जुने दर ७.४३ रुपये), ३०१–५०० युनिट: ११.८५ रुपये (जुने दर ११.९१ रुपये) आणि ५०० युनिट्सपेक्षा जास्त: १३.०७ रुपये (जुने दर १४.११ रुपये)वापरासाठी दरात कपात करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे टाटा पावरच्या दरांमध्येही सर्वच स्लॅबमध्ये घट करण्यात आली असून विशेषतः ०–१०० युनिट: ४.७० रुपये (जुने ४.७६ रुपये); १०१–३०० युनिट: ७.१० रुपये (जुने ७.९६ रुपये); ३०१–५०० युनिट: ११.६४ रुपये (जुने १३.५५ रुपये) आणि ५०० युनिट्सपेक्षा जास्त: १२.६४ रुपये (जुने १४.५५ रुपये) वापरणाऱ्या ग्राहकांना अधिक फायदा होणार आहे. अदानी इलेक्ट्रिसिटीने तर सर्व स्लॅबमध्ये लक्षणीय कपात केली असून कमी वापर करणाऱ्या ग्राहकांपासून ते जास्त वापर करणाऱ्यांपर्यंत सर्वांना याचा फायदा मिळणार आहे. अदानी इलेक्ट्रिसिटीसाठी नवीन दर: ०–१०० युनिट: ४.९३ रुपये (जुने ६.३८ रुपये);
१०१–३०० युनिट: ८.१३ रुपये (जुने ९.६३ रुपये); ३०१–५०० युनिट: ९.३८ रुपये (जुने ११.०३ रुपये); ५०० युनिट्सपेक्षा जास्त: १०.६३ रुपये (जुने ११.९८ रुपये).
याआधी महावितरणच्या वीज दरात कपात झाल्यानंतर राज्यभरातील ग्राहकांना दिलासा मिळाला होता. आता त्याच पार्श्वभूमीवर मुंबईतील ग्राहकांसाठीही हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. महावितरणने २०२५-२६ ते २०२९-३० या कालावधीसाठी सादर केलेल्या बहुवार्षिक वीजदर याचिकेला आयोगाने मान्यता दिली असून त्यानुसार पुढील पाच वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने दर कमी होत जाणार आहेत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कोणत्याही ग्राहक प्रवर्गासाठी वीज दर वाढवले जाणार नाहीत, ही खात्री आयोगाने दिली आहे.
गेल्या वर्षी मार्च अखेरीस दिलेल्या आदेशाला काही कारणांमुळे स्थगिती देण्यात आली होती, मात्र आता नव्याने अंमलबजावणी सुरू होत असल्याने ग्राहकांना प्रत्यक्ष दिलासा मिळणार आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर वीज दरात झालेली ही कपात मुंबईकरांसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणार असून घरगुती बजेटमध्ये काही प्रमाणात बचत होण्यास मदत होईल. त्यामुळे एप्रिलपासून लागू होणारे हे नवे दर मुंबईतील लाखो ग्राहकांसाठी एक सकारात्मक बदल ठरणार आहेत.






