मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार रणवीर सिंह सध्या आपल्या 'धुरंधर: द रिवेंज' (Dhurandhar 2) या चित्रपटामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक कामगिरी सुरू केली असून, अवघ्या ११ दिवसांत या सिनेमाने भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक मोठे विक्रम मोडीत काढले आहेत. एका जबरदस्त 'स्पाय ॲक्शन थ्रिलर'च्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या चित्रपटाने जगभरात आपला दबदबा निर्माण केला आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी १०० कोटींहून अधिकचा गल्ला जमवत आपले इरादे स्पष्ट केले होते. त्यानंतर केवळ ११ दिवसांच्या कालावधीत भारतात ८०० कोटी आणि जागतिक स्तरावर (Worldwide) १३०० कोटींपेक्षा जास्त कमाई करून 'धुरंधर २' ने नवा इतिहास रचला आहे. रिलीजच्या १२ व्या दिवशी, म्हणजेच दुसऱ्या सोमवारी, कामाच्या दिवसांमुळे (Working Day) कमाईत थोडीशी घट पाहायला मिळाली असली, तरी चित्रपटाचा वेग अद्याप कायम आहे. रणवीर सिंहचा वेगळा अंदाज आणि चित्रपटातील अंगावर काटा आणणारे ॲक्शन सीक्वेन्स प्रेक्षकांना थिएटरकडे खेचून आणत आहेत. सोशल मीडियावरही या चित्रपटाची मोठी क्रेझ पाहायला मिळत असून, ट्रेड विश्लेषकांच्या मते हा चित्रपट लवकरच १५०० कोटींचा टप्पा देखील पार करेल.
?si=OZWhCh2fmqo-FUwp
'धुरंधर: द रिवेंज'ची बाराव्या दिवसाची तब्बल इतकी...
९०० कोटींच्या उंबरठ्यावर 'धुरंधर २'
हा चित्रपट लवकरच ९०० कोटींच्या क्लबमध्ये दिमाखात प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट दिसत असून, या भव्य आकड्यापर्यंत पोहोचण्यासाठी चित्रपटाला आता केवळ २८ कोटी रुपयांची गरज आहे. येत्या एक-दोन दिवसांत हा टप्पा पार होण्याची दाट शक्यता असून, असे झाल्यास ९०० कोटींचा आकडा गाठणारा हा भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिला बॉलिवूड (हिंदी) चित्रपट ठरेल. 'धुरंधर २' हा गेल्या वर्षी ५ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या सुपरहिट 'धुरंधर' चित्रपटाचा सिक्वेल आहे. या चित्रपटात रणवीर सिंहने 'हमजा अली मजारी' नावाच्या एका धाडसी अंडरकव्हर भारतीय गुप्तचर एजंटची भूमिका साकारली आहे. पहिल्या भागात कराचीतील गुन्हेगारी विश्वाचे जाळे आणि पाकिस्तानच्या सत्ताकेंद्रांमधील घुसखोरी दाखवण्यात आली होती. मात्र, या सिक्वेलमध्ये हमजाच्या भूतकाळातील गुपिते उलगडण्यात आली आहेत. कराचीतील अत्यंत धोकादायक मानल्या जाणाऱ्या 'लियारी' भागात भारतावर मोठा हल्ला करण्याचा कट रचणाऱ्या दहशतवादी नेटवर्कचा नायनाट करण्यासाठी हमजा कशा प्रकारे जिवाची बाजी लावतो, याचा थरार या चित्रपटात पाहायला मिळतो. देशप्रेमाने ओतप्रोत भरलेले कथानक, जबरदस्त ॲक्शन सीक्वेन्स आणि रणवीर सिंहचा कसदार अभिनय यामुळे प्रेक्षकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतले आहे. ९०० कोटींच्या विक्रमाकडे लक्ष लागून असलेल्या या चित्रपटाने केवळ गल्लाच जमवला नाही, तर बॉलिवूडचा दबदबा पुन्हा एकदा जागतिक स्तरावर निर्माण केला आहे.






