नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ही एक अशी लीग आहे, ज्यात खेळण्याचे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते. पण जेव्हा एखादा क्रिकेटपटू ऐनवेळी स्पर्धेतून माघार घेतो, तेव्हा त्यामुळे केवळ संघांनाच अडचणी येत नाहीत, तर चाहतेही निराश होतात. इंग्लंडचा फलंदाज बेन डकेटच्या अलीकडील एका निर्णयामुळे एका नव्या वादाला तोंड फुटले असून, भारतीय क्रिकेटचे दिग्गज सुनील गावस्कर यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
ऐनवेळी आयपीएलमधून माघार घेणाऱ्या क्रिकेटपटूंवर कठोर कारवाई करण्याची मागणी गावस्कर यांनी केली आहे. लिलावात निवड झाल्यानंतर क्रिकेटपटूंना स्पर्धेतून माघार घेण्यापासून रोखण्यासाठी सध्याचा दोन वर्षांच्या बंदीचा नियम पुरेसा नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
या संदर्भात, भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी बीसीसीआयच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि म्हटले की, सध्याचा दोन वर्षांच्या बंदीचा नियम अपुरा आहे.त्यांच्या मते, जर क्रिकेटपटू कोणत्याही कठोर परिणामांशिवाय ऐनवेळी आयपीएलमधून माघार घेत राहिले, तर ही समस्या कायम राहील. त्यांनी सुचवले की, मंडळाने असा नियम लागू करावा, ज्यामुळे क्रिकेटपटूंवर खरा दबाव येईल.
गावस्कर म्हणाले, बीसीसीआयने यावर पुनर्विचार करण्याची गरज आहे, कारण दोन वर्षांची बंदी स्पष्टपणे प्रभावी ठरत नाहीये. तुम्हाला अशा शिक्षेचा विचार करण्याची गरज आहे, जिचा क्रिकेटपटूंवर परिणाम होईल. जोपर्यंत याचा खेळाडूच्या आयपीएलमध्ये परत येण्याच्या संधीवर परिणाम होत नाही, तोपर्यंत हा नियम निरुपयोगी ठरेल.
नियमानुसार, जर एखादा परदेशी क्रिकेटपटू लिलावात निवड झाल्यानंतर स्पर्धेतून माघार घेतो, तर त्याला दोन हंगामांसाठी आयपीएल आणि भविष्यातील लिलावांमधून वगळले जाऊ शकते. मात्र, जर एखाद्या क्रिकेटपटूची दुखापत किंवा वैद्यकीय कारणे वैध असल्याचे आढळले, तर त्याला या नियमातून सूट दिली जाऊ शकते. पण, अलीकडील प्रकरणांवरून हे स्पष्ट झाले आहे की क्रिकेटपटूंना परावृत्त करण्यासाठी हा नियम पुरेसा नाही.
अशा परिस्थितीत, डकेटवर आता लीग आणि भविष्यातील लिलावांमधून दोन वर्षांची बंदी येऊ शकते. ६.२५ कोटींना खरेदी करण्यात आलेल्या हॅरी ब्रुकनेही आयपीएलमधून माघार घेतली होती. आणि तो सध्या अशाच प्रकारच्या बंदीचा सामना करत आहे.






