Monday, March 30, 2026

Maharashtra Weather Alert : भर उन्हाळ्यात अवकाळी पावसाचा कहर; शेतकऱ्यांसाठी पुढील ४८ तास धोक्याचे

Maharashtra Weather Alert : भर उन्हाळ्यात अवकाळी पावसाचा कहर; शेतकऱ्यांसाठी पुढील ४८ तास धोक्याचे

मुंबई : राज्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढत असतानाच अचानक अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दुपारच्या वेळेतच मुसळधार पाऊस, गारपिट आणि वादळी वाऱ्यांनी अनेक जिल्ह्यांना तडाखा दिला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पुढील ४८ तास राज्यासाठी धोक्याचे असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

 पुणे शहरासह भोर तालुक्यात जोरदार पाऊस आणि गारपिट झाली. उत्रौली परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा अक्षरशः सडा पडला. अचानक आलेल्या या पावसामुळे उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला असला, तरी काढणीला आलेल्या ज्वारी, गहू आणि हरभरा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे कांदा, मका, गहू आणि हरभरा पिकांवर परिणाम होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

नाशिकमध्येही जोरदार वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाली. अनेक भागांत गारांचा खच साचल्याचे चित्र दिसून आले. या अचानक आलेल्या अस्मानी संकटामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. सिन्नर परिसरातही पावसाची नोंद झाली.

भारतीय हवामान विभागाने जळगाव जिल्ह्यासाठी पुढील ४८ तासांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. ताशी ५० ते ६० किमी वेगाने वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

अचानक बदललेल्या हवामानामुळे शेतमालाचे मोठे नुकसान होत असून, पुढील दोन दिवस राज्यातील परिस्थिती गंभीर राहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आणि शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >