अशासकीय शब्दांचा वापर करणाऱ्यांना आता सभागृहाबाहेरचा रस्ता
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिका सभागृहात यापुढे अशासकीय भाषा खपवून घेतली जाणार नाही. यापुढे जर सभागृहात ५० खोक्यांची भाषा झाल्यास त्यांना ५० ठोसे दिले जातील आणि त्यासाठी महायुतीच्या नगरसेवकांनी तयार राहावे. आज जी परिस्थिती आहे, ती भविष्यात मोठ्याप्रमाणात उद्भवेल आणि तेव्हा समारेच्या बाजुला जाण्याचीही तयार ठेवा असाही कानमंत्र सभागृहनेत्यांनी महायुतीच्या नगरसेवकांना दिला. मात्र, याचबरोबरच महापालिका सभागृहात अशासकीय शब्दांचा वापर करणाऱ्या सदस्यांवर तत्काळ कारवाई करण्याचीही मागणी करण्यात आली असून त्यादृष्टीकोनातून येत्या सभागृहांची दिशा बदलेली पहायला मिळणार आहे.
मुंबई महापालिका सभागृहात विराेधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी महापौर दालनात झालेल्या अपमानप्रकरणी हरकतीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर याचा निषेध करत सभात्याग केला. त्यानंतर सभागृहनेते गणेश खणकर यांनी सभागृहात जे वर्तन घडले ते दुर्दैवी आहे. मात्र आता भविष्यात आपल्याला मानसिक तयारी करावी लागेल. पाण्यात दगड मारायचा आणि पळ काढायचा असा प्रकार होतच राहणार. तसे खोक्याचे आरोप करत चिमटे काढणे असे प्रकार होतच राहणार. ही भाषा बरोबर नाही. पण यापुढे ५० खोक्यांचे जे भाषा करतील त्यांना ५० ठोसे देण्यासाठी तयार रहा. ही भाषा बरोबरच नाही.आज पेंग्विनचा उल्लेख केल्याशिवाय बैठक होत नाही आणि असे काैतुक करत पुढील वर्षी काहीतरी आपल्या पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न असतो.
तत्पूर्वी शिवसेनेच्या नगरसेविका व स्थापत्य समिती अध्यक्षा यामिनी जाधव यांनी उबाठाच्या नगरसेवकांकडून अमेय घोले यांना उद्देशून बोलायला तोंड आहे का असे बोलत ५० खोके अशी घोषणाबाजी केली याचा समाचार घेतला. यापुढे अशासकीय शब्दांचा वापर करणाऱ्यांविरोधात त्वरीत कारवाई केली जावी अशी मागणी त्यांनी केली. पूर्वी स्थायी समितीवर नाग बसला म्हणून बोलायचे. पण स्थायी समितीवर नाग नाही तर शेषनाग असून ते या तिजोरीचे रक्षणकर्ते आहेत. पूर्वी ही स्थायी समिती कोणाच्या इशाऱ्यावर चालायची असा सवाल करत मातोश्री २ कुठल्या पैशातून बांधली असा सवाल केला. तसेच पूर्वी खोके कुठे जात होते. पूर्वी मातोश्रीवरुन आदेश आल्याशिवाय एकतरी प्रस्ताव मंजूर केला जायचा का असा सवाल केला. आमचे कुटुंब आमची जबाबदारी असे ब्रीदवाक्य घेवून फिरणऱ्या नेत्याने जेव्हा आमच्या घरावर इन्कम टॅक्स,ईडीची धाड पडली तेव्हा, तुमचे तुम्ही बघा म्हणून सांगितले. पण आमचे कुटुंब, आमची जबाबदारी सांगणाऱ्या नेत्यांनी आम्हाला वाऱ्यावर सोडले. आजच आमच्यावर एवढे खोके, तेवढे खोके म्हणून आरोप करतात, तर मग हे शोधून दाखवा ना असे आव्हान दिले. कोणत्याही परिस्थितीत सभागृहाचे पावित्र्य टिकवले गेले पाहिजे,असे सांगितले.






